
वडिलांच्या अस्थी विसर्जन करून परतणाऱ्या मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू
वडिलांच्या अस्थी विसर्जन करून परतणाऱ्या मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) : नियतीचा खेळ अत्यंत क्रूर असतो, याचा प्रत्यय जळगावात आला आहे. आपल्या वडिलांच्या निधनाचे दुःख उराशी बाळगून अस्थी विसर्जन आटोपून घराकडे परतणाऱ्या मुलाला काळाने गाठले. कानळदा रस्त्यावरील बौद्ध विहाराजवळ भरधाव ट्रॅक्टरने चिरडल्याने अशोक नंदकिशोर तिवारी (वय ५०, रा. शनिपेठ) यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांच्या निधनानंतर अवघ्या दोनच दिवसांत मुलाचाही अपघाती अंत झाल्याने तिवारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अस्थी विसर्जनावरून परतताना अपघात
शनिपेठ परिसरातील रहिवासी नंदकिशोर रामदेव तिवारी यांचे २८ डिसेंबर रोजी निधन झाले होते. शनिवारी (३० डिसेंबर) सकाळी त्यांचे पुत्र अशोक तिवारी हे चुलत भाऊ आणि पाहुण्यांसह विदगाव येथील तापी नदीच्या पात्रात अस्थी विसर्जनासाठी गेले होते. विधी आटोपून दोन दुचाकींनी हे सर्व जण जळगावकडे परतत असताना सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
ट्रॅक्टरने चिरडले, चालकाचे पलायन
अशोक तिवारी हे गोपी ईश्वर उपाध्ये यांच्या दुचाकीवर मागे बसलेले होते. कानळदा गावाजवळील बौद्ध विहाराजवळ समोरून येणाऱ्या खडीने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने (एमएच १९, सीव्ही, ८५१०) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दोघेही रस्त्यावर कोसळले. दुर्दैवाने, अशोक तिवारी यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच अंत झाला. या अपघातात गोपी उपाध्ये हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर चालक ट्रॅक्टर सोडून घटनास्थळावरून पसार झाला.
परिसरात हळहळ
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी अशोक तिवारी यांना तपासून मृत घोषित केले. वडिलांच्या अंत्यविधीचे सोपस्कार पूर्ण होत नाहीत, तोच कर्त्या पुत्राचाही मृत्यू झाल्याने शनिपेठ परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार चालकाचा शोध घेतला जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम