
वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडून तत्काळ दखल; पंचनाम्याचे आदेश देण्याची मागणी
वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडून तत्काळ दखल; पंचनाम्याचे आदेश देण्याची मागणी
जळगाव, जळगाव लोकसभा मतदारसंघातील अनेक भागांमध्ये काल रात्री आलेल्या वादळी वाऱ्यांनंतर झालेल्या पावसामुळे केळी, पपईसह इतर नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक बागायती पिके जमीनदोस्त झाली असून, जनावरांच्या मृत्यूमुळेही शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात सापडले असताना, खासदार स्मिताताई वाघ यांनी या परिस्थितीची तत्काळ दखल घेतली आहे.
खासदार वाघ यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण नुकसानीची माहिती दिली असून, पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.
खासदार वाघ यांनी आज स्वतः प्रभावित गावांचा दौरा करून प्रत्यक्ष शेतात जाऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. केळी-पपई बागायतींतील पडझड, वादळामुळे मृत्युमुखी पडलेली जनावरे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी यांचा सखोल अभ्यास करत त्यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह संवाद साधला.
दौऱ्यादरम्यान त्यांनी संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवकांना स्पष्ट सूचना दिल्या की, पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळू शकेल. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत धीर देत पुनर्वसनासाठी तातडीने मदतीचे प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम