
विशिष्ट ध्येय गाठण्यापेक्षा तिथपर्यंतचा प्रवास महत्त्वाचा असतो- डॉ.एस.एम.कानडजे
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने काव्यांकुर स्पर्धेचे आयोजन
विशिष्ट ध्येय गाठण्यापेक्षा तिथपर्यंतचा प्रवास महत्त्वाचा असतो- डॉ.एस.एम.कानडजे
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने काव्यांकुर स्पर्धेचे आयोजन
बुलढाणा प्रतिनिधी
आपल्याला माहित आहे. आपण जमिनीमध्ये बी पेरतो तेव्हा त्याला पाणी, प्रकाश, हवा मिळते. तेव्हा ते बीज अंकुरते आणि हळूहळू त्या बीजाची वाढ होत असते. वय 5 ते 15 वर्षाच्या मुलांवर संस्कार करण्याचे हे वय असते. या वयामध्ये त्यांच्यावर केलेली संस्कार हे त्यांच्या आयुष्यभर कामी पडतात. साधारण दीड पावणे दोन वर्षानंतर मुल बोलायला लागते. चार साडे चार वर्षाच्या वयात मुलांनी चांगली गीत, गाणी, चांगले संवाद ऐकवले तर मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार होत असतात. अशा प्रकारचे संस्कार करण्याची जबाबदारी पालकांची असते.
लहानपणी चांगली गीत गाणी संवाद मुलांनी ऐकले तर त्यांचे चांगले भरणपोषण होते. ही गाणी आणि संवाद त्यांचे आयुष्यभर स्मरणात राहतात. अशा माध्यमातून मुलांना बर्याच गोष्टी शिकता येतात. या स्पर्धेच्या माध्यमातून सादरीकरणा बरोबरचा अभिनयही त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करतो आणि .विशिष्ट वेशभूषेसह त्यांनी केलेले सादरीकरण स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित करत असते. स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणे हे महत्त्वाचे आहे. मना भावापासून सादरीकरण केले तर त्यातून निश्चितच आनंद मिळतो. विशिष्ट ध्येय गाठण्यापेक्षा ते गाठण्यासाठी जे प्रयत्न केले जातात ते फार महत्त्वाचे असतात.
मुक्कामाचे स्थळ गाठण्यापेक्षा प्रवासाचा आनंद फार महत्त्वाचा असतो. असे प्रतिपादन मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटीच्यावतीने आयोजित काव्यांकुर मराठी कविता सादरीकरण स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रा.डॉ. एस. एम. कानडजे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कांव्याकुरच्या आयोजना मागची भुमिका मृण्मयी मल्टीपर्पजच्या अध्यक्ष डॉ.वैशाली निकम यांनी विशद केली.मराठी भाषा गौरव दिनाच्या निमीत्ताने मराठी काव्यांकुर मराठी कविता सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धेमध्ये शौर्या संदीप साठे वय वर्ष 5 हिने कवी अनंत राऊत यांच्या कवितेच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली तर मानव नंदू आप्पा बोरबळे वय वर्ष 10 याने कवी इंद्रजीत भालेराव यांच्या “काट्या कुट्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता” या कवितेने उपस्थितांचे डोळे पाणावले.
सदर स्पर्धेमध्ये रसिक म्हणून आजी आजोबांची उपस्थिती होती व त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये आमच्या बालपणातील पाठ केलेल्या कविता आज या ठिकाणी परत कानावर पडल्यामुळे आमचे बालपण पुनर्जीवित झाल्यासारखे वाटले.मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने काव्यांकुर स्पर्धेच्या आयोजनाच्या ठिकाणी राम जाधव यांनी बहिणाबाई, ना. धो. महानोर दासू वैद्य, विशाल मोहिते यांच्यासह विविध कवींच्या कवितांची कॅलिग्राफी केलेले फलक लक्षवेधी होते. याप्रसंगी रेखा कचरे यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने व शिवरात्रीच्या पर्वावर रेखाटलेल्या रांगोळीने उपस्थितांचे लक्ष वेधुन घेतले. काव्यांकुर स्पर्धेत लहान गटात शौर्या साठे प्रथम, सानिका सदावर्ते व्दितीय,अर्पित टाकळकर, तृतीय, मल्हार हिंगणे व वेदांत पायघन यांना प्रोत्साहनपर पारितोषिकाने गौरविण्यात आले.मोठ्या गटात मानव बोरबळे प्रथम, सृष्टी जाधव द्वितीय, सई वानखेडे तृतीय, अन्वी जोशी व तुषार कचरे यांना प्रोत्साहनपर पारितोषिकाने गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी कर्नल सुहास जतकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. स्पर्धेचे परीक्षक म्हणून शब्दाखातर ह्या मराठी कविता गजल कार्यक्रमाचे प्रमुख गझलकार विशाल मोहिते व साहित्य केसरी 2025 वैशाली तायडे यांनी काम पाहिले व दोघांनीही आपल्या मनोगतामध्ये फक्त पाल्य नाही तर या ठिकाणी पाल्यांसोबत आलेल्या त्यांच्या पालकांचे व आजी आजोबांचे कौतुक केले. काव्यांकुर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्षितिज निकम व शलाका पवार या चिमुकल्यांनी केले तर आभार प्रदर्शन मृण्मयी मल्टीपर्पस सोसायटीचे सचिव डॉ. गजेंद्र निकम यांनी केले.स्पर्धेच्या आयोजनासाठी रविकिरण टाकळकर, डॉ. गजेंद्र निकम, शाम पवार, श्रद्धा पवार , समाधान एडके यांनी पुढाकार घेतला होता.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम