
शेतकऱ्यांची मागणी : राज्यातील सर्व शिव पानंद शेतरस्त्यांची निशुल्क हद्द निश्चित करावी
शेतकऱ्यांची मागणी : राज्यातील सर्व शिव पानंद शेतरस्त्यांची निशुल्क हद्द निश्चित करावी
जमाबंदी आयुक्त तथा संचालक, भूमी अभिलेख यांना निवेदन
पुणे (प्रतिनिधी) : राज्यातील शेतकऱ्यांनी शिव पानंद शेतरस्त्यांच्या निशुल्क हद्द निश्चितीची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. यासाठी जमाबंदी आयुक्त तथा संचालक, भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना निवेदन देण्यात आले आहे.
शेतकरी नेते शरद पवळे आणि दादासाहेब जंगले पाटील यांच्या नेतृत्वाखालील या निवेदनात, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेतरस्त्यांच्या प्रश्नी त्वरित निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतरस्त्यांअभावी शेतजमीन पडीक पडत असून, शेतकऱ्यांना फौजदारी स्वरूपाच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. शासन निर्णय घेतले जात असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांनी पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत :
1. शिव पानंद शेतरस्त्यांना अधिकृत क्रमांक देऊन सातत्याने सर्वेक्षण सुरू करावे व बेकायदेशीररित्या हटवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी.
2. शासनाने शेतरस्त्यांसाठी निशुल्क मोजणीचा निर्णय घेतला असतानाही तालुका भूमी अभिलेख कार्यालयाने घेतलेली सर्व शुल्काची रक्कम व्याजासह शेतकऱ्यांना परत करावी.
3. शासकीय शिव पानंद शेतरस्त्यांवर अतिक्रमण झाल्यास कोणतीही तक्रार मिळताच तातडीने कारवाई करावी.
4. शेतरस्त्यांच्या प्रकरणांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांनीच न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी.
5. हद्द निश्चितीनंतर अपील करण्याचा अधिकार नसावा, जेणेकरून प्रक्रिया जलद पार पडेल.
6. राज्यातील सर्व शिव पानंद शेतरस्त्यांचे मोजणी काम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावे.
7. गाव नकाशावरील बंद शेतरस्त्यांचा अहवाल घेऊन, प्रशासनाने त्वरित बंद रस्ते सुरू करण्याचे आदेश द्यावेत.
8. गाव नकाशावर शेतरस्त्यांची लांबी व रुंदी स्पष्टपणे नोंद करावी.
शेतकऱ्यांनी या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही करण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम