शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा सरकारकडून प्रयत्न…!

रविकांत तुपकरांसहित हजारो शेतकऱ्यांना मुंबईत अटक

बातमी शेअर करा...

शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा सरकारकडून प्रयत्न…!

रविकांत तुपकरांसहित हजारो शेतकऱ्यांना मुंबईत अटक

सरकार आम्हा शेतकऱ्यांना घाबरले -तुपकर ; शेतकरी व पोलिसांमध्ये तुफान राडा..!

मुंबई-,प्रतिनिधी सरकारने जागोजाग अडवणूक आणि पोलिस बळाचा वापर केला तरी मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या हजारो शेतकऱ्यांना पनवेल नजीकच्या नढळ येथे बुधवारी (दि.19) पहाटेपासून डांबून ठेवले होते.लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करणार आहोत असे सांगूनही पोलिसांनी रविकांत तुपकर आणि शेतकऱ्यांना रोखून धरले. दरम्यान, आम्हाला गोळ्या घातल्या तरी कर्जाचा बोजा असलेले सातबारे अरबी समुद्रात बुडवणारच म्हणत बुधवारी (दि.19) दुपारी बारा वाजता रखरखत्या उन्हात रविकांत तुपकर व हजारो महिला- पुरुष शेतकऱ्यांनी पोलिसांचा विरोध झुगारून मुंबईच्या दिशेला जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या संख्येने असलेल्या पोलिस आणि आंदोलक शेतकरी यांच्यात तुफान राडा झाला.हातापायी झाली.हातात दंडूके घेतलेले पोलीस आणि घोषणा देणारे शेतकरी यांच्यात तब्बल तासभर घमासान सुरू होते. आम्हाला गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही म्हणत तुपकर भूमिकेवर ठाम होते. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत रविकांत तुपकर, ऍड शर्वरी तुपकर, प्रदेशाध्यक्ष राजू कसबे, नारायण लोखंडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना अटक केली. जग पोशिंदया शेतकऱ्यांना आंदोलनापासून रोखल्याने राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.

क्रांतिकारी शेतकरी संघटना अधिवेशन काळात मुंबईत मोठे आंदोलन करत असल्याची सरकारने चांगलीच धास्ती घेतली होती. हे आंदोलन चिरडण्यासाठी इंग्रजांनी क्रांतिकारकांना जशी वागणूक दिली तशाच पद्धतीने सरकारच्या इशाऱ्यावर पोलीस रविकांत तुपकर आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत वागले. बुलढाण्यातून अडीचशे गाड्या येणार होत्या परंतु आदल्या दिवशी मध्यरात्री कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना जबरदस्तीने पोलीस ठाण्यात आणून डांबण्यात आले. गाड्यांचे चालक आणि गाडी मालकांनाही ताब्यात घेतले. तुपकर यांच्या धर्मपत्नी शर्वरी यांच्या आई आजारी असताना त्यांना भेटायला जाऊ दिले नाही. मामाच्या अंत्यविधीला जाण्यापासूनही रोखले. परंतु पोलीस आपल्या मागावर असल्याचे ओळखून रविकांत तुपकर चाणक्ष पद्धतीने भूमिगत झाले आणि गनिमी पद्धतीने मुंबई दाखल झाले. दरम्यान त्यांच्यापाठोपाठ राज्यभरातील हजारो कार्यकर्ते मिळेल त्या वाहनाने पोलिसांची नजर चुकवत मुंबईत आले. पनवेल नजिक असलेल्या एका मंदिर संस्थानात शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि महिला मुक्कामी थांबले होते.या ठिकाणी अर्ध्या रात्री खालापूर व मुंबईतील शेकडो पोलीस दाखल झाले. त्यांनी जबरदस्तीने शेतकरी कार्यकर्त्यांना मंदिरातच डांबून ठेवले. यानंतर तिथे रविकांत तुपकर आले. त्यांनी सरकार व पोलिसांना सवाल करत आम्ही शेतकरी आहोत, दाऊद अथवा कसाबचे हस्तक नाहीत. घटनेने दिलेल्या संवैधानिक अधिकारातून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. तरीदेखील आम्हाला का रोखले आहे. सरकारनेच निवडणुकीपूर्वी संपूर्ण सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांना या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आमचा सत्याग्रह आहे. आम्ही कर्जाचा बोजा असलेले सातबारे, कवडीमोल भाव मिळत असल्याने तीन वर्षापासून घरात पडून असलेले सोयाबीन व कापूस अरबी समुद्रात बुडवत आहोत. आमचे आंदोलन शांततेत आहे. एकीकडे गुंड, दरोडेखोर आणि व्हाईट कॉलर भू व वाळू माफियांना तुम्ही मोकळे सोडता आणि शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकता हा कुठला न्याय आहे? असा सवाल करत राज्यातील सत्ताधारी लोकांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नावरील लक्ष हटवण्यासाठी कबरी खोदण्याच्या मुद्द्यावर अधिवेशनात चर्चा करत आहेत. शेतकऱ्यांना भिकेला लावून अंबानी अदानी सारख्या उद्योगपतींचे इमल्यावर इमले उभे करत आहेत, असा आरोप रविकांत तुपकर यांनी केला. तसेच सरकारच्या सांगण्यावरून पोलिसांनी आम्हाला गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाहीत. आरबी समुद्रात आंदोलन करणारच असा इशारा दिला.

दरम्यान, दुपार झाली तरी पोलीस बाहेर पडू देत नसल्याने शेवटी बारा वाजता रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी अरबी समुद्राकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. अतिशय रखरखत्या उन्हात पोलिस आणि शेतकरी कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. तब्बल तासभर पोलीस व शेतकरी यांच्यात संघर्ष सुरू होता. शेतकरी घोषणा देत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते तर शेकडो पोलिसांची बटालियन काठ्या आडव्या लावून त्यांना मागे सारत होती.

शेवटी रविकांत तुपकर व त्यांच्या अनेक सहकारी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करत खालापूर पोलीस ठाण्यात अटक करून नेले.

दरम्यान, सरकारने पोलिसांचे प्रचंड बळ वापरून शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकल्याने राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.

लाठ्या आणि बंदूक घेऊन आलेल्या पोलिसांना

जेवण- पाणी देण्याची दानत शेतकऱ्यांमध्येच

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मुंबईतील आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी प्रचंड बळाचा वापर केला. सरकारच्या इशाऱ्यावर रविकांत तुपकर व त्यांचे कुटुंबीय, शेतकरी कार्यकर्ते यांचा अक्षरशः छळ केला. शेतकऱ्यांना एक पाऊलही पुढे टाकू द्यायचे नाही यासाठी पोलीस काठ्या आणि बंदुका घेऊन आले होते. याही परिस्थितीत भल्या पहाटेपासून रात्री पर्यंत शेकडोच्या संख्येने उपस्थित असलेल्या पोलिसांच्या पाणी, चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली. दुश्मनावरही दातृत्व दाखवण्याची दानत केवळ शेतकऱ्यांमध्येच असल्याचे यातून दिसून आले.

अखेर तुपकर समर्थकांनी अरबी समुद्रात बोटीतून सातबारा व सोयाबीन बुडवलेच..!

अखेर आंदोलन यशस्वी केलेच

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सरकार आणि पोलिसांनी आकाश पाताळ एक केले. एवढ्यानंतरही बीडचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बहाद्दर शिलेदार कुलदीप करपे व त्यांचे सहकारी बुधवारी (दि. 19) दुपारी मुंबई पोलिसांची तटबंदी भेदत बोटीद्वारे अरबी समुद्रात दाखल झाले. जव्हा पिकलं तव्हा लुटलं, आता देणं घेणं फिटलं, म्हणत अरबी समुद्रात कर्जाचा बोजा असलेल्या सातबारा तसेच कवडी मोल भाव मिळाल्याने तीन वर्षापासून घरात पडून असलेला कापूस व सोयाबीन अरबी समुद्रात बुडवले. यावेळी आम्ही कर्जमुक्त होणारच अशा घोषणा दिल्या. तसेच रविकांत तुपकर व आंदोलक शेतकऱ्यांना खालापूर पोलिसांनी बळाचा वापर करून केलेल्या बेकायदेशीर अटकेचा जाहीर निषेध नोंदवला.पोलिसांना गुंगारा देऊन तुपकर समर्थकांनी समुद्रात प्रतिकात्मक आंदोलन केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम