
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सातत्याने प्रयत्न करू – आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे
अपप्रचाराचा खणखणीत समाचार ; पक्षवाढ आणि विकासाचे संकल्प
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सातत्याने प्रयत्न करू – आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे
अपप्रचाराचा खणखणीत समाचार ; पक्षवाढ आणि विकासाचे संकल्प
यावल प्रतिनिधी
यावल तालुक्यातील खरेदी-विक्री संघाच्या आवारात झालेल्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत चोपडा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि विकासकामांसाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. शेतकरी हाच या राज्याचा आधार असून, त्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कर्जमाफीबाबत ठाम भूमिका
आमदार सोनवणे म्हणाले, “या वर्षीचे राज्याचे बजेट ४५ हजार कोटींचे असून, ते त्रुटीचे आहे. यंदा थोडेसे ‘लाडक्या बहिणींच्या बजेट’मुळे शेतकऱ्यांसाठी मोठी तरतूद करता आली नाही. पण पुढील वेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू.” त्यांनी कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना आश्वस्त केले की, शेतकरी वर्गाच्या कल्याणासाठी ते कायम आग्रही राहतील.
विरोधकांकडून होणाऱ्या अपप्रचारावर टीका करताना सोनवणे म्हणाले, “माझे मूळ गाव पिळोदा (ता. यावल) असून, मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो आहे. खोटं बोलण्याची स्पर्धा तालुक्यात सुरू असेल, तरी आम्ही घाबरणारे नाही. तुम्ही माझ्यासोबत आहात आणि मी तुमच्यासोबत आहे. चुकीचे काही करत नाही, खोटे बोलत नाही, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.” त्यांनी कार्यकर्त्यांचे बैठकीसाठी आभार मानले आणि प्रत्येक गावात भेटी देऊन समस्या समजून घेण्याचे आश्वासन दिले.
“प्रत्येक गावात आठ-दहा दिवस थांबून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू. पक्षाला मजबूत करायचे आहे. आपला भगवा ध्वज सातत्याने फडकत ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले. पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्राला सशक्त करायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीकडे वाटचाल करत आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यासोबत पाडर धरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे पाच तालुक्यांचा पाणीप्रश्न कायमचा सुटेल.”
मागील कामांचा दाखला
आमदार सोनवणे यांनी मागील आमदार लता सोनवणे यांच्या कार्यकाळात मतदारसंघात २,५०० कोटींची कामे मंजूर झाल्याचा उल्लेख केला. “मागील आठवड्यात ज्या कामांचे फलक लावले, ती त्यांच्याच काळातील आहेत. अजून १०० ते १५० कामांचे भूमिपूजन बाकी आहे. कामांचा सुकाळ सुरूच राहील,” असे ते म्हणाले. मागील सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांनीही विकासाला चालना दिल्याचे त्यांनी नमूद केले.
महायुतीसाठी एकजुटीचे आवाहन
“महायुतीचे पदाधिकारी सर्वत्र मजबूत व्हावेत, यासाठी एकदिलाने प्रयत्न करा. पक्षवाढीसाठी आणि नव्या महाराष्ट्राच्या उभारणीसाठी सर्वांनी हातात हात घालून काम करावे,” असे आवाहन करत आमदार सोनवणे यांनी सभेची सांगता केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम