
सततच्या नापिकीला कंटाळून अडावद येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
सततच्या नापिकीला कंटाळून अडावद येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
अडावद ता. चोपडा येथील जगदिश नगरातील रहिवासी आबा गोरख महाजन (३६) या कर्जबाजारी शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून अती गोळ्यांचे सेवन करून आत्महत्या केली.
१२ रोजी सकाळी राहत्या घरात त्यांनी औषधी गोळ्यांचे अती सेवन केले. त्यानंतर त्यांना त्रास सुरुझाल्याने इलाज करण्यासाठी चोपडा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात रवानगी केली. चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी एक बाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत विझली. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना पाटील यांच्या खबरीने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
आबा महाजन हे वर्डी शिवारात चार बिघे असलेली शेती कसत होते. यावर्षी मुग, उडीद, मका अशी लागवड केली होती. पाऊस कमी झाल्याने मुग , उडदाचे पीक आले नाही. त्यावर कांदे लावण्यासाठी कांद्याचे बियाणे टाकून रोप तयार केले होते. मागच्या आठवड्यात एक दिवस झालेल्या जोरदार पावसाचा फटका कांदे रोपास झाला. आधीच भारतीय स्टेट बँकेचे कर्ज होते. परत कांदे लागवडीकरिता शेती तयार करण्यासाठी हात उसनवारी करून पैसे आणले होते. ते कसे फिटेल या विवंचनेत त्यांनी औषधी गोळ्यांचे अती सेवन करून आपली जीवनयात्रा संपवली. मयत आबा महाजन यांच्या पश्चात पत्नी, १३ वर्षाचा मुलगा, १० वर्षाची मुलगी वृद्ध आई वडील असा परिवार होता.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम