
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ जणांचा जागीच मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ जणांचा जागीच मृत्यू
मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर
जालना : समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकने महिंद्रा पिकअप वाहनाला दिलेल्या जोरदार धडकेत आठ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कडवंची शिवारात घडली. या अपघातात मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अपघाताच्या वेळी महामार्गावर गवत काढण्याचे काम सुरू होते. या कामासाठी आलेल्या महिला कामगारांची पिकअप गाडी जामवाडी शिवारात उभी होती. त्याचवेळी नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, वाहनातील सात महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर काही जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी अन्नाचे डबे, चपला आणि साहित्य विखुरलेले दिसून आले, तसेच रक्ताचा सडा पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
या दुर्घटनेत अल्काबाई दादाराव आदमाने (वय ४५, निधोना), लक्ष्मीबाई संतोष मदन (वय ३५, केळीगव्हाण), मीना परमेश्वर आदमाने (वय ४५, निधोना), कांचनबाई प्रकाश आदमाने (वय ५०, निधोना), ताराबाई गहेनाजी चौधरी (वय ६०, केळीगव्हाण), कडुबाई रामदास मदन (वय ५५, केळीगव्हाण), सुमनबाई कचरू आदमाने (वय ७०, निधोना) आणि मंगलबाई शिनगारे यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. “ही अत्यंत दुर्दैवी घटना असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात शासन सहभागी आहे. जखमींना तातडीने उपचार देण्यात येत असून प्रशासन घटनास्थळी कार्यरत आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम