
सायबर गुन्ह्यांवर अंकुशासाठी आठ पोलीस अंमलदारांची बदली
सायबर गुन्ह्यांवर अंकुशासाठी आठ पोलीस अंमलदारांची बदली
डॉ. महेश्वर रेड्डी यांचा निर्णय; जळगाव सायबर पोलीस ठाण्यात नेमणूक
जळगाव : कायदा व सुव्यवस्था तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलात अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून आठ पोलीस अंमलदारांची नेमणूक जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.
२५ फेब्रुवारी रोजी झालेल्या जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला. कायदा व सुव्यवस्था राखणे आणि सायबर पोलीस ठाण्याचे कामकाज अधिक सक्षम करणे या उद्देशाने मंडळाला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये एक पोलीस हेड कॉन्स्टेबल, दोन महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल, एक महिला पोलीस नाईक आणि चार पोलीस कॉन्स्टेबल/नाईक यांचा समावेश आहे.
बदली करण्यात आलेल्या अंमलदारांमध्ये पोहेकॉ राजेंद्र गुरमल राठोड (शहर वाहतूक शाखा, जळगाव), महिला पोहेकॉ निता सुभाषसिंग राजपूत (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव), महिला पोना सारिका रविंद्र वाणी (यावल पोलीस ठाणे), पोकॉ निखिल मुकुंदा नारखेडे (पोलीस मुख्यालय, जळगाव), पोकॉ विनोद दुर्गालाल चौधरी (यावल पोलीस ठाणे), पोना कल्पेश मुरलीधर आमोदकर (रावेर पोलीस ठाणे), पोकॉ मुकेश पांडुरंग लोकरे (पिंपळगाव हरे पोलीस ठाणे) आणि पोकॉ भूषण अशोक माळी (वरणगाव पोलीस ठाणे) यांचा समावेश आहे.
संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना या अंमलदारांना तत्काळ कार्यमुक्त करून त्यांचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांनी संबंधितांना हजर करून घेतल्याचा अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. सायबर गुन्ह्यांवर अधिक प्रभावी नियंत्रण मिळवणे आणि पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम