
सावदा भूमिअभिलेख कार्यालयात कामकाजाची दिरंगाई; नागरिकांचे हाल, अधिकारी बेफिकीर
सावदा भूमिअभिलेख कार्यालयात कामकाजाची दिरंगाई; नागरिकांचे हाल, अधिकारी बेफिकीर
सावदा (प्रतिनिधी) – सावदा येथील भूमिअभिलेख कार्यालयात नागरिकांच्या महत्त्वाच्या शासकीय कामांमध्ये वारंवार होणाऱ्या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शेतजमिनी, प्लॉट फेरफार, वारस नोंदणी यांसारख्या कामांसाठी नागरिकांना अनेक वेळा कार्यालयाचे फेऱ्या माराव्या लागत असून, कार्यालयीन कारभारात शिस्त अभावी ही कामे महिनोनमहिने प्रलंबित राहत आहेत.
अनेक वेळा हे मुद्दे माध्यमांतूनही अधोरेखित झाले असले तरी संबंधित अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्षच केले जात आहे. नागरिकांच्या वेळ आणि पैशाची नासाडी होत असून, अनेकांना न्याय वेळेत मिळत नाही. कार्यालयात अधिकारी व कर्मचारी नियमितपणे अनुपस्थित राहतात, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल सुरूच आहेत.
विशेष म्हणजे, कोणतेही शासकीय काम ठराविक कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक असताना सावदा भूमिअभिलेख कार्यालयात वेळेचे कोणतेही बंधन पाळले जात नाही. नागरिकांनी वारंवार कामे प्रलंबित राहण्याचे कारण विचारले तरी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
शहर व परिसरातील नागरिक आपल्या जमिनीच्या नोंदी, फेरफार, वारसनोंदी यासाठी कार्यालयात येतात. मात्र येथे कामकाजाची अत्यंत संथ गती असून, दोनच कर्मचारी कार्यरत असताना देखील नागरिकांच्या अर्जांवर योग्यवेळी कारवाई होत नाही. आठवड्यातून केवळ दोन दिवस कार्यालय खुले राहते, त्यामुळे दररोज कार्यालय सुरू ठेवावे अशी नागरिकांची मागणी आहे.
दरम्यान, यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना तंबी दिली होती. मात्र परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. परिणामी, आता संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय अहवाल मागवून कार्यवाही करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम