सावदा मंडळातील केळी उत्पादकांना ११.०७ कोटींची पीक विमा भरपाई मंजूर

बातमी शेअर करा...

सावदा मंडळातील केळी उत्पादकांना ११.०७ कोटींची पीक विमा भरपाई मंजूर

आ. एकनाथराव खडसे यांच्या तारांकित प्रश्नाला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे उत्तर

मुक्ताईनगर : सावदा महसूल मंडळातील सन २०२४–२५ च्या आंबिया बहार फळपीक विमा योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच विम्याची रक्कम जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत दिली. आमदार एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती स्पष्ट केली.
विधानपरिषदेत बोलताना आ. खडसे यांनी नमूद केले की, रावेर तालुक्यातील सावदा मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२४ मध्ये काढलेल्या हवामान आधारित फळपीक विम्याची रक्कम नियमानुसार दि. १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत त्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते. मात्र दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी वा त्यादरम्यान शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाली नसल्याचे निदर्शनास आले.
सावदा, उदळी, तांदलवाडी आदी परिसरातील बाधित शेतकऱ्यांना व्याजासह विमा भरपाई देण्यात यावी तसेच संबंधित विमा कंपन्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
यावर उत्तर देताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत आंबिया बहार सन २०२४–२५ मध्ये सावदा महसूल मंडळातील १६२२ पात्र शेतकऱ्यांना एकूण रुपये ११,०७,२६,२७८ इतकी नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे.
विमा रकमेच्या विलंबाबाबत त्यांनी स्पष्ट केले की, भारतीय कृषी विमा कंपनी (एआयसी) कडून निधीची मागणी नोव्हेंबर २०२५ च्या अखेरीस प्राप्त झाली आहे. त्यानुसार राज्य शासनाकडून निधी वितरीत करण्याची तांत्रिक कार्यवाही सुरू असून लवकरच ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.
आमदार एकनाथ खडसे यांनी सावदा, उदळी व तांदलवाडी परिसरातील प्रलंबित विमा प्रश्न तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहात मांडल्याने आता कोट्यवधी रुपयांच्या निधीचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम