साहित्य अकादमी पुरस्काराने  जळगावचे राजू बाविस्कर सन्मानित 

बातमी शेअर करा...

साहित्य अकादमी पुरस्काराने  जळगावचे राजू बाविस्कर सन्मानित 

‘काळ्यानिळ्या रेषा’ आत्मकथेचा देशपातळीवर गौरव 
 प्रतिनिधी I जळगाव
नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात २०२५ सालच्या साहित्य अकादमी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले मराठी भाषेसाठी जळगावचे प्रसिद्ध चित्रकार व लेखक राजू बाविस्कर यांना त्यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेसाठी प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

देशातील मान्यताप्राप्त २४ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींचा गौरव करण्यासाठी दरवर्षी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांत यंदा विविध साहित्यप्रकारांचा समावेश करण्यात आला होता. मराठी साहित्यातील प्रभावी आणि वेगळ्या शैलीतील आत्मकथनासाठी राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या पुस्तकाची निवड करण्यात आली. नवी दिल्लीतील कमानी ऑडिटोरियममध्ये झालेल्या या समारंभात साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते बाविस्कर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रख्यात हिंदी साहित्यिक विश्वनाथप्रसाद तिवारी, अकादमीच्या उपाध्यक्षा कुमुद शर्मा, संस्कृती मंत्रालयाचे संचालक अनीश राजन आणि अकादमीच्या सचिव पल्लवी होळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

******
सृजनशीलतेचा गौरव न झाल्यास
समाज मूल्यहीन होण्याचा धोका
विश्वनाथप्रसाद तिवारी यांनी साहित्यिकांचा सन्मान हे समाजाचे कर्तव्य असल्याचे अधोरेखित केले. सृजनशीलतेचा गौरव न झाल्यास समाज मूल्यहीन होण्याचा धोका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. साहित्यिकांच्या लेखनातून समाजाला प्रेरणा व मूल्ये मिळतात, लेखकाचे जीवन अनेक अनुभवांनी समृद्ध असते, असेही त्यांनी नमूद केले. पारतंत्र्याच्या काळात भारतेंदू हरिश्चंद्र यांच्या साहित्याने निर्माण केलेल्या सामाजिक जागृतीचा दाखला देत त्यांनी स्वदेशी आणि स्वभाषा चळवळींच्या उगमावर प्रकाश टाकला.
******

अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेविषयी माहिती दिली. सचिव पल्लवी होळकर यांनी प्रास्ताविक करताना साहित्य अकादमीच्या कार्याचा आढावा घेतला, उपाध्यक्षा कुमुद शर्मा यांनी उपस्थितांचे आभार मानले. विविध साहित्यप्रकारांतील (काव्यसंग्रह, कादंबरी, कथासंग्रह, निबंध, समीक्षा आणि आत्मकथा) अशा पुस्तकांची निवड तज्ज्ञ समितीद्वारे करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

भाषिक परंपरांचा सन्मान
यंदाच्या पुरस्कारांमध्ये आसामी, बांगला, बोडो, डोगरी, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, कश्मीरी, कोकणी, मैथिली, मलयाळम्, मणिपुरी, नेपाली, ओडिया, पंजाबी, राजस्थानी, संस्कृत, संताली, सिंधी, तमिळ, तेलुगु आणि उर्दू या भाषांतील साहित्यिकांचाही गौरव करण्यात आला. विविध भाषिक परंपरांचा सन्मान राखत देशाच्या साहित्यविश्वाला समृद्ध करणाऱ्या या कृतींना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याचे चित्र या पुरस्कारांमधून दिसून आले.

अन्य भाषिकांचीही उत्सुकता वाढली
या पुरस्कारामुळे मराठी साहित्याला राष्ट्रीय स्तरावर पुन्हा प्रतिष्ठेचे स्थान मिळाले असून, राजू बाविस्कर यांच्या कार्याची दखल देशभर घेतली जात आहे. त्यांच्या आत्मकथेमधून उलगडणारे जीवनानुभव आणि कलात्मक अभिव्यक्ती यामुळे मराठी वाचकांसह इतर भाषिक वर्तुळातही या पुस्तकाबद्दल उत्सुकता वाढली आहे. २०२५ सालचे साहित्य अकादमी पुरस्कार विविधतेतून एकतेचा संदेश देत भारतीय साहित्य परंपरेचा गौरव करणारे ठरले मराठीसह सर्व भाषांतील सृजनशीलतेला नवे व्यासपीठ मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले .

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम