
हतनूर येथे किरकोळ कारणावरून मारहाण
हतनूर येथे किरकोळ कारणावरून मारहाण
जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर गावात घराच्या बांधकामावर पाणी मारल्याच्या किरकोळ कारणावरून शनिवारी (१८ ऑक्टोबर) रात्री ८ वाजता एक धक्कादायक घटना घडली. शेजारी राहणाऱ्या तिघा व्यक्तींनी एकाच कुटुंबीयांवर लाकडी फळीने मारहाण करून गंभीर दुखापत केली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना रघुनाथ कोळी (वय ४२) आपल्या कुटुंबासह हतनूर येथे वास्तव्यास आहेत. घटनेच्या दिवशी त्यांच्या घराच्या बांधकामावर पाणी मारण्याचे काम सुरू होते. यावेळी शेजारी सविता भीमा सुरवाडे, अतुल भीमा सुरवाडे आणि योगेश अर्जुन सुरवाडे यांनी पाणी अंगावर उडल्याचा मुद्दा सांगत त्यांच्यावर हाणामारी सुरू केली.
तिन्ही आरोपींनी अर्चना कोळी यांच्यासह त्यांचे दीर आणि सासू यांना लाकडी फळीने मारहाण केली, ज्यात जखमींना डोक्यावर आणि शरीरावर गंभीर दुखापत झाली.
जखमी कोळी कुटुंबीयांनी त्वरित वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली, त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. घटनेनंतर हतनूर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल यासीन पिंजारी करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम