
हवामानावर आधारित केळी पीक विमा घोटाळा; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिस
हवामानावर आधारित केळी पीक विमा घोटाळा; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिस
बोगस विम्यामुळे ३७ कोटी रुपये राज्य सरकारकडे जप्त, CSC केंद्रांवरही चौकशी
जळगाव (प्रतिनिधी) — जिल्ह्यात हवामानावर आधारित केळी पीक विमा योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. कृषी विभागाने ‘एमआरसॅक’च्या माध्यमातून सॅटेलाईटवर केलेल्या पडताळणीत ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर बोगस केळी विमा काढल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी सुमारे ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास प्रशासन कायदेशीर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
प्राथमिक तपासात असे आढळले की, २७ हजार शेतकऱ्यांनी केळी लागवड नसतानाही विमा घेतला, तर २९ हजार शेतकऱ्यांनी दुसऱ्याच्या शेतजमिनीवर केळी लागवड दाखवून विमा काढला. या दोन्ही प्रकारांमुळे एकूण ५५ हजार शेतकऱ्यांचा बोगस विमा उघडकीस आला आहे.
अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत जमा झालेली ३७ कोटी रुपयांची विमा रक्कम राज्य शासनाने जप्त केली असून, ज्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) केंद्रांवरून बोगस फॉर्म भरले गेले, अशा ४८ केंद्रांवरही सखोल चौकशी सुरू आहे. चौकशी नंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून, नोटिसांना मिळालेल्या उत्तरांनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्पष्ट केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम