४५ कोटींची तरतूद, प्रस्ताव मात्र २५० कोटींचे; मनपाची ‘आमदनी चवन्नी, खर्चा रुपया’ स्थिती

बातमी शेअर करा...

४५ कोटींची तरतूद, प्रस्ताव मात्र २५० कोटींचे; मनपाची ‘आमदनी चवन्नी, खर्चा रुपया’ स्थिती

जळगाव : महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात रस्ते व गटारींसाठी अवघ्या ४५ कोटी रुपयांची तरतूद असताना नगरसेवकांकडून तब्बल २५० कोटींचे विकास प्रस्ताव सादर झाल्याने मनपाची आर्थिक स्थिती ‘आमदनी चवन्नी, खर्चा रुपया’ अशी झाल्याचे चित्र समोर आले आहे.

महापालिकेच्या महासभेत मंजूर अर्थसंकल्पानुसार रस्त्यांसाठी ३० कोटी तर गटारींसाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र अर्थसंकल्प मंजूर होऊन अवघा महिना उलटत नाही तोच भाजपच्या नगरसेवकांनी सुमारे ८० कोटींचे, तर शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी तब्बल १७० कोटींचे प्रस्ताव महापौर दीपमाला काळे यांच्याकडे सादर केले आहेत.

महापौरांकडे आलेले हे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी आयुक्तांकडे पाठविण्यात आले असून, मर्यादित निधीत कोणते प्रस्ताव मंजूर करावेत आणि कोणते प्रलंबित ठेवावेत, असा मोठा पेच प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून निधी मिळेल, या अपेक्षेने शिंदे गटाचे नगरसेवक मोठ्या प्रमाणावर प्रस्ताव सादर करत असल्याचे सांगितले जात आहे. याउलट भाजप नगरसेवकांना अपेक्षित पाठबळ मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजी असल्याची चर्चा आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या तंग असल्याने महसूल वाढीसाठी विविध उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असल्याने विकासकामांना निधी उभारणे हे मोठे आव्हान ठरत आहे.

यातच मनपा मालकीच्या व्यापारी संकुलांमधील गाळ्यांचे करार २०१२ पासून नूतनीकरण न झाल्याने कोट्यवधींची थकबाकी अडकून पडली आहे. हा विषयही प्रलंबित राहिल्याने मनपाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.

एकीकडे मोठ्या प्रमाणावर विकास प्रस्तावांचा पाऊस, तर दुसरीकडे तिजोरीत खळखळाट—या विरोधाभासी परिस्थितीत जळगाव महानगरपालिकेसमोर आर्थिक समतोल राखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम