हतनूर धरणाचे १० दरवाजे उघडले; तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बातमी शेअर करा...

हतनूर धरणाचे १० दरवाजे उघडले; तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भुसावळ (प्रतिनिधी) – हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील जलसाठा झपाट्याने वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरण प्रशासनाने रविवारी (२९ जून) ४१ पैकी १० दरवाजे प्रत्येकी १ मीटरने उघडले असून, तापी नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, सध्या हतनूर धरणाची पाण्याची पातळी २११.१२० मीटरवर पोहोचली आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता २४०.८० दलघमी असून, सध्या ते ६२.०६ टक्के भरले आहे. पाण्याची वाढती आवक लक्षात घेऊन प्रशासनाने सुमारे ५७० क्युमेक्स (अंदाजे २०,१३० क्युसेक्स) वेगाने पाणी तापी नदीपात्रात विसर्ग सुरू केला आहे.

धरणाचे सध्या १० दरवाजे उघडण्यात आले असून, पावसाचा जोर असाच राहिल्यास आणखी दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे तापी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, महसूल व जलसंपदा विभागाकडून संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या भागात अनावश्यक वावर टाळण्याची सूचना केली आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी बचाव आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पाण्याचा विसर्ग नियोजनबद्ध आणि टप्प्याटप्प्याने करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम