
भाजप नगरसेवकांच्या पहिल्याच बैठकीत मानापमान नाट्य
भाजप नगरसेवकांच्या पहिल्याच बैठकीत मानापमान नाट्य
आंदोलन व परस्पर निवेदनांवरून खडाजंगी; महापौरांची कडक सूचना
जळगाव : महानगरपालिका निवडणुकीत सत्ता मिळवल्यानंतर महापौर दालनात आयोजित करण्यात आलेली भाजप नगरसेवकांची पहिली बैठक अपेक्षेप्रमाणे गाजली. गेल्या काही दिवसांत काही नगरसेवकांनी प्रशासनाविरुद्ध केलेली आंदोलने आणि आयुक्तांना दिलेली परस्पर निवेदने याचे तीव्र पडसाद या बैठकीत उमटले. त्यामुळे काही काळ मानापमानाचे नाट्य रंगले आणि पहिलीच बैठक काहीअंशी वादळी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महापौर दीपमाला काळे आणि सभागृह नेते नितीन लढा यांनी आक्रमक पवित्रा घेत नगरसेवकांना स्पष्ट सूचना दिल्या. कोणत्याही नगरसेवकाने आपल्या प्रभागातील समस्या, विकासकामे किंवा धोरणात्मक विषयांबाबत आयुक्तांना परस्पर निवेदने देऊ नयेत, असे त्यांनी बजावले. तसेच पक्षशिस्त पाळत आंदोलन, उपोषण किंवा निदर्शने करण्यापूर्वी महापौर आणि सभागृह नेत्यांना विश्वासात घेणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या घटनांवरून वादाची ठिणगी
बैठकीत प्रामुख्याने दोन घटनांवरून खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. नगरसेविका वैशाली पाटील यांनी आयुक्तांकडे प्रशासक काळातील कामांची ‘श्वेतपत्रिका’ काढण्याची मागणी केली होती. तसेच स्थायी समिती सभापती निवडीच्या दिवशीच प्रभाग क्रमांक १५ चे नगरसेवक व गटनेते प्रकाश बालाणी, अरविंद देशमुख, चेतन शिरसाळे आणि अनिल अडकमोल यांनी कचरा प्रश्नावरून महापालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले होते. या घटनांमुळे बैठकीत तीव्र चर्चा रंगली.
महासभेसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना
दरम्यान, येत्या महिनाभरात महानगरपालिकेची महासभा होणार असल्याने नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील कामांचे प्रस्ताव आणि सूचना वेळेत महापौर किंवा नगरसचिवांकडे सादर कराव्यात, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम