
शास्ती योजना : पहिल्याच दिवशी ४९ लाख ७२ हजारांची वसुली
शास्ती योजना : पहिल्याच दिवशी ४९ लाख ७२ हजारांची वसुली
१५ दिवसांत १४० कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीचे मनपापुढे मोठे आव्हान
जळगाव (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या अभय शास्ती योजनेला पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून चारही प्रभागांतून मिळून तब्बल ४९ लाख ७२ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तथापि, मनपापुढे अवघ्या १५ दिवसांत सुमारे १४० कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे मोठे आव्हान उभे आहे.
यंदा ही योजना राबवण्यास प्रशासनाने सुरुवातीला नकार दर्शविला होता. मात्र महापौर दीपमाला काळे यांच्या स्पष्ट आदेशानंतर महापालिकेने १५ दिवसांसाठी अभय शास्ती योजना राबवण्यास मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत दंडात सवलत देऊन थकीत मालमत्ता कर वसूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महापौरांनी प्रशासकीय मतभेद बाजूला ठेवत वसुली प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना दंडातील सवलतीचा लाभ घेता येईल. त्याचबरोबर थकबाकीदारांना कर भरण्याची ही शेवटची संधी असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. तब्बल २१ हजार ५५९ मालमत्ताधारकांनी अभय शास्ती योजनेचा लाभ घेत सुमारे २९ कोटी ८४ लाख रुपयांची थकबाकी भरली होती. यंदाही मनपा प्रशासनाला तसाच प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, चालू आर्थिक वर्षासाठी महापालिकेचे कर वसुलीचे एकूण उद्दिष्ट २०० कोटी रुपये आहे. आतापर्यंत सुमारे ६० कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले असून मार्च अखेरपर्यंत उर्वरित १४० कोटी रुपये वसूल करण्यासाठी अवघे १५ ते २० दिवस उरले आहेत. त्यामुळे कर वसुलीसाठी मनपाची यंत्रणा आता अधिक वेगाने कामाला लागली असून थकबाकीदारांविरोधात पुढील काळात कठोर कारवाईचे संकेतही देण्यात आले आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम