आता महिलांना घरबसल्या नोंदविता येणार तक्रार

बातमी शेअर करा...

आता महिलांना घरबसल्या नोंदविता येणार तक्रार

‘महिला सन्मान पोर्टल’ व सायबर वेलनेस सेलची स्थापना; अत्याचार व सायबर गुन्ह्यांवर लगाम

जळगाव (प्रतिनिधी) : महिलांवरील वाढत्या अत्याचार आणि सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत ‘महिला सन्मान पोर्टल’ आणि सायबर वेलनेस सेल सुरू करण्याचा पुढाकार घेतला आहे.

या नव्या सुविधेमुळे महिलांना आता घरबसल्या ऑनलाइन तक्रार नोंदविता येणार आहे.

ऑनलाइन तक्रारीमुळे भीती कमी

महिला सन्मान पोर्टल हे केवळ तक्रार नोंदविण्याचे साधन नसून महिलांच्या हक्कांचे संरक्षण करणारे प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे. पोलिस ठाण्यात जाण्याच्या संकोचामुळे अनेक महिला तक्रार करत नाहीत. मात्र, या पोर्टलमुळे कोणत्याही वेळी मोबाइल किंवा संगणकाच्या माध्यमातून तक्रार नोंदवणे शक्य होणार आहे.

सर्व पोलिस ठाण्यांशी जोडलेले पोर्टल
हे पोर्टल राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पोलिस ठाण्यांशी जोडलेले असून, तक्रार दाखल होताच ती संबंधित पोलिस ठाण्याकडे आपोआप वर्ग केली जाणार आहे. त्यामुळे तक्रारींची प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे.

तातडीने कारवाईची हमी
तक्रार नोंदविताना गुन्ह्याचा प्रकार, वेळ आणि ठिकाण याची माहिती द्यावी लागणार असून, गंभीर प्रकरणांमध्ये ठराविक कालमर्यादेत प्राथमिक तपास पूर्ण करण्याचे बंधन पोलिसांवर असणार आहे.

तक्रारींची स्थिती ट्रॅक करता येणार
तक्रार दाखल केल्यानंतर तिची सद्यस्थिती, तपासाची प्रगती आणि पुढील कारवाई याची माहिती पोर्टलवर पाहता येणार आहे. प्रत्येक तक्रारीला स्वतंत्र युनिक आयडी देण्यात येणार आहे.

सायबर वेलनेस सेलची मदत
सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने ब्लॅकमेलिंग, मॉर्फिंग आणि सोशल मीडियावरील छळवणूक रोखण्यासाठी सायबर वेलनेस सेल कार्यरत राहणार आहे. या सेलमार्फत पीडित महिलांना तांत्रिक व कायदेशीर मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.

गुन्ह्यांचे वास्तव चित्र
जिल्ह्यातील महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये बलात्कार व विनयभंगाच्या घटनांचे प्रमाण चिंताजनक असून, या नव्या उपक्रमामुळे अशा गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम