
शिंदे गटाचे ६ आमदार दौऱ्यात अनुपस्थित तर फडणवीसांचे दोन खास आमदार सोबतीला ?
दै. बातमीदार । २६ नोव्हेबर २०२२ । राज्यात शिंदे गटाचे यशस्वी सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गटाच्या आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटी दौऱ्यावर गेले आहेत. याठिकाणी एकनाथ शिंदे आणि इतर आमदार कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्यानंतर सर्व काही सुरळीत पार पडू दे, यासाठी एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीला नवस केल्याची चर्चा आहे. हा नवस फेडण्यासाठीच एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटीला गेल्याचे सांगितले जाते. एकनाथ शिंदे यांनी या चर्चा फेटाळाल्या असल्या तरी त्यांच्या गटातील इतर आमदारांनी कोणताही आडपडदा न बाळगता आमचे हिंदुत्त्ववादी विचारांचे सरकार आहे, नवस फेडणे आमच्या श्रद्धेचा भाग आहे, त्यामुळे फक्त कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाण्यात काहीही गैर नसल्याचे सांगितले आहे. मात्र, शिंदे गटाच्या या गुवाहाटी दौऱ्याला पाच आमदार आणि एका खासदाराने दांडी मारल्याचे समोर आले आहे.
यामध्ये चंद्रकांत पाटील, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, महेंद्र दळवी आणि संजय गायकवाड आणि खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. मतदारसंघातील पूर्वनियोजित कामांमुळे आपण गुवाहाटीला जाणार नसल्याचे संबंधित आमदारांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी शिंदे गटासोबत भाजपचे दोन नेते मात्र गुवाहाटीला रवाना झाले आहेत. हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील मानले जातात. यापैकी एक म्हणजे मंत्री रवींद्र चव्हाण आणि दुसरे म्हणजे मोहित कंबोज. शिंदे गटासोबत हे दोन्ही नेते गुवाहाटीला कशाला गेले असावते, यावरुन बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत.
यासंदर्भात बोलताना आमदार रवींद्र चव्हाण यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांनी मला फोन करुन सांगितले की, रवी आपल्याला गुवाहाटीला देवीच्या दर्शनासाठी जायचे आहे. मुख्यमंत्र्यांचा आदेश असल्यामुळे मी गुवाहाटीला जात आहे. हे हिंदुत्त्ववादी विचारांचे सरकार आहे. या सगळ्यात आपल्याला कुठेतरी देवाची साथ पाहिजे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आपल्याला कामाख्या देवीच्या दर्शनाला गेलेच पाहिजे, असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले. मोहित कंबोज यांनीही नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला जाण्याच्या एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे समर्थन केले. गुवाहाटीत असताना शिंदे-फडणवीस सरकार आकाराला आले. तेव्हा एकनाथ शिंदे यांना राज्याला स्थिर सरकार मिळो, असा नवस बोलला होता. तो नवस फेडण्यासाठीच आम्ही गुवाहाटीला जात आहोत, असे मोहित कंबोज यांनी म्हटले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम