
बिपोरजॉय चक्रीवादळाने पाऊस या भागात कोसळणार !
दै. बातमीदार । १३ जून २०२३ । देशातील अरबी समुद्रात उठलेले बिपोरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने आगेकूच करत असले तरीदेखील या वादळाचा प्रभाव म्हणून कोकण किनारपट्टीला देण्यात आलेला वारा आणि पावसाचा इशारा मंगळवारी कायम आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात वेगाने वारे वाहतील आणि पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
बिपोरजॉय चक्रीवादळ पुढे सरकले तरी त्याचा आस मागे राहत असून, चक्रीवादळाचे ढग पाऊस घेऊन येतात. हा पाऊस मंगळवारी मुंबईत कोसळू शकतो आणि याच काळात मुंबईत वेगाने वारे वाहतील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी रात्री नऊ नंतर पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावल्याचे चित्र होते.
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्हयांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिपोरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही सागरावर परिणाम झाल्याचे दिसून येत होते. गेटवे ऑफ इंडियाच्या किनाऱ्यावरच्या दगडी बंधाऱ्याला समुद्राच्या लाटा आक्रमकपणे धडकत होत्या. कुलाबा येथे उधाणाच्या भरतीच्या लाटांनी सागरकिनाऱ्यावरील बंधाऱ्याला असे जोरदार धक्के दिले. सागराच्या या वेगळ्या रौद्र रूपातही किनाऱ्यावरील मुलांनी आपला भिजण्याचा आनंद लुटला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम