
लोकतंत्र आहे की मनुतंत्र आहे ? भुजबळ यांचे टीकास्त्र !
दै. बातमीदार । २९ मे २०२३ । देशातील नवीन संसदेचे नुकतेच उद्घाटन झाले आहे. यावर आता विरोधी गटाकडून अनेक प्रतिक्रिया येवू लागल्या असून यात राज्यातील कॉंग्रेस नेते छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात सदनात जयंती साजरी करायला विरोध नाही. परंतु याठिकाणी शिवराज मुद्रा लावली आहे. ती झाकून सावरकर यांचा पुतळा लावला गेला. तिथेच छोट्या चौकात दोन पुतळे आहेत. त्यात राजमाता अहिल्याबाई आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला केले गेले. ही घटना मनाला दुःख देणारी आहे, या प्रकरणी आयोजकांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली. नाशिक येथील कार्यालयात भुजबळांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र सदनात मोठ्या हॉलची व्यवस्था असताना कार्यक्रम तिथे का घेण्यात आला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे व हा मूर्खपणा कुणी केला त्याच्यावर कारवाई करावी. पुतळे हटविण्याचे काम का केले, जाणीवपूर्वक हे केले का हे शोधावे, असे आवाहन त्यांनी केले.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले की, या सोहळ्याबद्दल अतिशय वाईट वाटले. पहिल्या संसद भवनाच्या वेळी स्वातंत्र्याचे लढव्यये होते. आता मात्र उघड बंब माणसे होती. त्यांच्या मध्येच पंतप्रधान मोदी उभे होते. या सोहळ्यावर पवार साहेब म्हणाले ते खरे आहे. या धर्मकांडामध्ये सहभागी झालो नाही याचा आनंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशात लोकशाही व्यवस्था आहे, राजव्यवस्था नाही. लोकशाहीत जनता राजा आहे. आता मात्र लोकतंत्र आहे की मनुतंत्र आहे ? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित करत मोदींनी जे केले ते मनाला वेदना देणारे असल्याचे भुजबळ यांनी म्हटले. असा सोहळा राम मंदिर, शिव मंदिरात ठीक होता, पण हे लोकशाहीच्या मंदिरात अपेक्षित नव्हता, अशी टीकाही त्यांनी केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम