
आम्ही माफी मागितली का ? संजय राऊत आक्रमक !
दै. बातमीदार । ९ मार्च २०२३ । राज्याच्या राजकारणातील शिवसेना, भाजप व ठाकरे गट यांच्यातील वाद मिटण्याची नाही तर वाढण्याची शक्यता नेहमी वाटत आहे. यांच्या तिहेरी भांडणात राष्ट्रवादीसह कॉंग्रेस बघ्याची भूमिका जरी घेत असले तरी महाविकास आघाडीतील पक्षाचे नावासह चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेवून गेल्याने ठाकरे गटाच्या चांगल्या जिव्हारी लागले आहे. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एक विधान केल्याने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे.
आम्ही त्यांना आधीच माफ केलं आहे, मनात कोणतीही कटुता नाही, असं सूचक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि ठाकरे गटाला डिवचलं. यानंतर खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्याकडे माफ करा अशा मागण्या कोणी केल्या नव्हत्या, असं राऊत म्हणाले आहेत. याबद्दल संजय राऊत आज माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले,”त्यांच्याकडे कोणी माफ करा अशा मागण्या कोणी केल्या नव्हत्या. त्यांना माफ करायचं की नाही, हे आम्ही ठरवणार आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष, हिंदुत्ववादी पक्ष, केंद्रीय यंत्रणा आणि पैशांचा वापर करत तोडला हा महाराष्ट्रावर आघात आहे.
महाराष्ट्रातली जनता ही वेदना विसरणार नाही, असंही राऊतांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले, “राज्याची जनताच आता ठरवेल त्यांना माफ करायचं की नाही मात्र महाराष्ट्रातील जनता ही वेदना विसरणार नाही. तुम्ही माफीचं वाटप करायला बसला आहात का? महाराष्ट्राच्या काळजात घुसलेला घाव आहे. शिवसेना कधीही विसरणार नाही. भाजपकडून हात जरी आला तरी अजिबात स्वीकारल्या जाणार नाही. राजकारणात मतभेद होत असतात पण तुम्ही बाळासाहेबांनी निर्माण केलेला पक्ष फोडता, तोडता आणि चोर लफंग्यांच्या हातात ठेवता कोण तुम्हाला माफ करेल?

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम