
मूळव्याधाची कारणे, लक्षण व काय केले पाहिजे ? जाणून घ्या सविस्तर !
दै. बातमीदार । ९ डिसेंबर २०२२ । आजकालच्या तरूणाईत बदलत्या जीवनशैलीमुळे मूळव्याधाचे प्रमाण वाढले आहे. मूळव्याध नेमका का होतो? याचं कारणं कोणती? दिनश्चर्येत झालेल्या बदलांमुळे तसेच, योग्य आहार न घेतल्यास मूळव्याधाचा त्रास जाणवतो. शौचाच्या मार्गे सूज येणं, शौचाच्या मार्गातून रक्तस्राव होणं, शौच करताना अडखळल्यासारखं वाटणं, आग होणं, जळजळणं, खाज सुटणं यांसारखी लक्षणं मूळव्याधातून जाणवतात.
मूळव्याधाची लक्षणं कोणत्या कारणामुळे जाणवतात?
सर्वात पहिलं कारण म्हणजे आहार आणि विहार. आपण दिवसभर करत असलेली दिनश्चर्या. आणि आपण घेत असलेला आहार या गोष्टीत आलेली विषमता यामुळे या आजाराचं प्रमाण जास्त वाढलं आहे. दररोजच्या लाईफस्टाईलमुळे हे आजार दिसून येतात. आहारात कमी घेत असलेले तंतुमय पदार्थ म्हणजे फायबरचे अतिशय कमी प्रमाणात सेवन तसेच भाज्या, फळभाज्यांचं कमी प्रमाणात सेवन, कमी प्रमाणात पाणी पिणे यांसारख्या गोष्टींमुळे खाल्लेलं अन्न पचत नाही. अपचन होतं आणि बद्धकोष्टता निर्माण होते. बरेचजण एसीमध्ये काम करतात. 8-10 तास कंप्युटरसमोर काम केल्यामुळे शरीराची कमी हालचाल होते. तसेच, व्यायाम न केल्यामुळे, खाल्लेलं अन्न न पचल्यामुळे हे आजार आढळून येतात.
मूळव्याध टाळण्यासाठी काय खबरदारी घ्याल?
नियमित फायबर्स, भाज्या, पालेभाज्या, फळांचा समावेश जेवणात असायलाच हवा.
3-5 लीटर पाण्याचे सेवन करावे.
अति प्रमाणात चहा, कॉफी यांचं सेवन टाळलं पाहिजे.
मद्यपान कमी करणे. यांसारख्या सवयींमुळे बद्धकोष्टतेचा त्रास होतो. बद्धकोष्टता हा मूळव्याधाचा जन्मदाता आहे.
मूळव्याधाचा आजार टाळण्यासाठी नियमितपणे व्यायामाला जाणं गरजेचं आहे. धावणं, पळणं किंवा जिममध्ये जाणं या गोष्टी शरीरासाठी गरजेच्या आहेत. स्वत:साठी एक तास किमान घालवला पाहिजे. या एक तासामध्ये जर तुम्ही तुमच्या शरीराची योग्य काळजी घेतली तर तुमचं पचन सुरळीत होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शौचास नियमित होतं. आपल्याला कोणत्याह प्रकारचा जोर करावा लागत नाही. शौचास जोर न करावा लागल्यामुळे आपल्याला मूळव्याध, भगंदर, फिशर इत्यादी आजारांपासून लांब राहता येतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे.
मूळव्याध हा आजार जर तुम्हाला आढळला किंवा या संबंधित लक्षणं आढळली तर सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. बरेचदा रूग्ण मेडिकलमधून एखादं औषध खरेदी करतो. आणि या आजारातून जरा फरक आला तर टाळतो. मात्र, असे न करता. सर्वात आधी डॉक्टरांकडे जाऊन या आजाराचं निदान करून घेणं गरजेचं आहे. आणि नेमकं निदान झाल्यानंतर त्यावर कोणत्या प्रकारचा आहार घेतला, कोणत्या प्रकारची दिनश्चर्या केली तर आपल्याला बरं वाटेल हे आपण समजून घेतलं पाहिजे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम