“मनसेने फक्त स्वप्न पहावी, अस्तित्व नाही ; खा.विनायक राऊत

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ नोव्हेबर २०२२ । राज ठाकरे यांनी मुंबईतील गट प्रमुखांच्या मेळाव्यात मनसेने आतापर्यंत केलेल्या आंदोलनावर भाष्य केलं. तसंच उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवरही टीकेचे बाण सोडले होते, यावर ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी आरोप केलाय कि, अध्यक्ष राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात. “मनसेने फक्त स्वप्न पहावी, अस्तित्व नाही. निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात,” असं राऊत म्हणाले. ते रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारीला लागा. मी तुमच्या हाती महापालिकेची सत्ता आणून देतो, असं राज ठाकरे गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित करताना म्हणाले होते. त्यावर विनायक राऊत म्हणाले की, “त्यांनी फक्त स्वप्न पाहावीत. निवडणूक आली की अस्तित्त्व दाखवण्यासाठी असे मेळावे घ्यायचे. निवडणुकीच्या वेळी कोणाची ना कोणाची सुपारी वाजवायची हा धंदा मागील अनेक वर्षांपासून राज ठाकरे यांनी चालू केलेला आहे.” विनायक राऊत पुढे म्हणाले की, “राज ठाकरे फक्त नक्कल करुन राजकारण करत आहेत. बाळासाहेबांचं नाव घेऊन उद्धव ठाकरे यांची नक्कल करायची. पायाला ठेच लागली तरी तुम्ही मुंबईला अॅडमिट होता. उद्धव ठाकरे यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर होतंय ही राज ठाकरे यांची पोटदुखी आहे.”

राज ठाकरे काय म्हणाले होते?
राज ठाकरे यांनी 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील गोरेगावमधल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. “कालपरवापर्यंत मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले तब्येतीचं कारण सांगून घरात बसले. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली अन् आता हे सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणारा मी नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेणारा मी नाही. मी यांच्यासारखा नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? कधी भूमिका घेतलीच नाही. पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, मला सत्तेत बसवा अशी भूमिका घेतली. फक्त पैशासाठी आणि सत्तेसाठी याच्यासोबत त्याच्यासोबत गेले,” असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम