जळगाव–छत्रपती संभाजीनगर ‘खान्देश एक्सप्रेस’ समृद्धीला जोडणार

बातमी शेअर करा...

जळगाव–छत्रपती संभाजीनगर ‘खान्देश एक्सप्रेस’ समृद्धीला जोडणार

आमदार एकनाथ खडसे यांच्या प्रश्नावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती

मुंबई : जळगाव जिल्ह्याच्या दळणवळण आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या प्रश्नावर आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत सरकारला धारेवर धरले. त्यांच्या पाठपुराव्यानंतर सरकारने प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली असून १०५ किलोमीटर लांबीचा ‘खान्देश एक्सप्रेस’ मार्ग लवकरच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग याला जोडला जाणार असल्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सभागृहात स्पष्ट केले.

विधानपरिषदेच्या कामकाजादरम्यान प्रलंबित प्रश्न मांडताना खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात केलेल्या घोषणेची आठवण करून दिली. “जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हा रस्ता सहा पदरी करून तो समृद्धी महामार्गाला जोडण्याची घोषणा झाली होती. मात्र अद्याप ठोस कार्यवाही दिसत नाही. हा रस्ता नेमका कधी पूर्ण होणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. जळगाव व संपूर्ण खान्देशच्या विकासासाठी हा मार्ग अत्यंत कळीचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यावर उत्तर देताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, जळगाव ते छत्रपती संभाजीनगर या १०५ किलोमीटर लांबीच्या महामार्गाला ‘खान्देश एक्सप्रेस’ असे नाव देण्यात आले आहे. हा मार्ग सहापदरी असून तो थेट समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे. सध्या सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम वेगाने सुरू असून, अहवाल पूर्ण झाल्यानंतर तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्यक्ष कामास प्रारंभ करण्यात येईल.
हा मार्ग पूर्ण झाल्यास जळगाव ते छत्रपती संभाजीनगर प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

जळगावचा शेतीमाल, विशेषतः केळी, समृद्धी महामार्गामार्गे मुंबई व नागपूरसारख्या मोठ्या बाजारपेठांपर्यंत जलद गतीने पोहोचू शकेल. तसेच उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा यांच्यातील व्यापार आणि दळणवळणाला चालना मिळेल, असेही खडसे यांनी नमूद केले. प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार एकनाथ खडसे यांनी सभागृहात मांडलेल्या या प्रश्नामुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांमध्ये, विशेषतः शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आता सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला केव्हा सुरुवात होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम