
दै. बातमीदार । ४ नोव्हेबर २०२२ देशभरात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या ५४ टक्के जास्त पाऊस झाला असून याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. ऑक्टोबरच्या पावसामुळे खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्याचा परिणाम म्हणून पुढील किमान तीन महिने धान्याचा तुटवडा जाणवू शकतो. यामुळे धान्यासह भाज्या, दूध व तेलाच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता स्टेट बँक ऑफ इंडियाने व्यक्त केली आहे.
जून-जुुलैमध्ये पेरणीला आलेले धान्य ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये काढणीला येणार होते. मात्र, यंदाच्या ऑक्टोबर महिन्यातील पावसाने गेल्या चार वर्षांतील विक्रम ओलांडले. परतीच्या मान्सूनचा सर्वाधिक फटका कृषिप्रधान राज्यांना बसला. यामुळे खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीमुळे सर्वसामान्यांना भीषण महागाईसाठी तयार राहावे लागण्याचा इशारा स्टेट बँकेच्या “इकोरॅप’ या ३१ ऑक्टोबर रोजी प्रकाशित अहवालात देण्यात आला आहे.
धान्यासह भाज्या, दूध, डाळी आणि तेलाच्या किमती महागाई मोजण्यासाठी वापरला जाणारा ग्राहक मूल्य निर्देशांक (कन्झ्युमर प्राइस इंडेक्स-सीपीआय) निर्धारित करतात. हा निर्देशांक वस्तूंच्या किरकोळ किमतीवरून काढला जातो. ऑक्टोबर २०१९ मध्ये देशात ४४% जास्त पाऊस झाला. त्या वेळी ३ महिन्यांचा सीपीआय ४.९ टक्क्यांवरून १०.९ झाला होता. यंदा ५४% अधिक पाऊस पडल्याने सप्टेंबरमध्ये ४.९% असणारा सीपीआय ऑक्टोबरमध्ये ८.४% झाला. यामुळे पुढील तीन महिन्यांत अन्नधान्याचे दर वाढण्याची शक्यता स्टेट बँकेने वर्तवली आहे.
यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात शेतीप्रधान उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान आाणि महाराष्ट्र या ५ राज्यांत पावसाच्या धारा सरासरीपेक्षा ४२१ टक्क्यांपर्यंत जास्त कोसळल्या. देशात एकूण ५४ टक्के अधिक पाऊस झाला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम