मुख्यमंत्री शिंदेंच्या कानात व मनात किडा वळवळतो ; संजय राऊतांची टीका

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ डिसेंबर २०२२ । हिवाळी अधिवेशन सुरु असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रेशीम बाग येथील संघ मुख्यालयाला भेट दिली. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, संघविचाराचा रेशीम किडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानात व मनात वळवळत आहे. त्यामुळेच त्यांनी आज रेशीम बागेला भेट दिली असेल. एकनाथ शिंदेंनी पक्षांतर केले आहे, मात्र एवढ्या लवकर त्यांचे रक्तांतर होईल, असे वाटले नव्हते. उद्या मुख्यमंत्री कार्यालयात एकनाथ शिंदे खाकी चड्डी व काळी टोपी घालून आले तरी आपल्याला नवल वाटणार नाही.

याशिवाय मुंबई पालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाने दावा सांगितला आहे. यावरून काल मुंबई पालिकेत ठाकरे व शिंदे गटात जोरदार राडा झाला. यावरूनही संजय राऊतांनी शिंदे गटावर टीका केली. संजय राऊत म्हणाले, शिंदे गट घुसखोरच आहे. त्यांना स्वत:चे अस्तित्व नाही. गद्दारांना दुसऱ्यांच्या कार्यालयात घुसण्याची सवयच असते. मात्र, शिंदे गटाने सत्तेशिवाय आमच्यासमोर येऊन दाखवावे. त्यांनी आम्ही काय आहोत, हे दाखवून देऊ. संजय राऊत म्हणाले, पालिकेच्या शिवसेनेच्या कार्यालयात शिरलेल्या शिंदे गटाला मुळच्या शिवसैनिकांनी त्यांचा हिसका दाखवलाच आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेचे बहुमत आहे. त्यामुळे तेथील पक्ष कार्यालय हे आमचेच आहे. असे असूनही प्रशासक असलेल्या मुंबई पालिकेच्या आयुक्तांनी आमचे कार्यालय सील केले. त्यापूर्वी आम्हाला नोटीसही दिली नाही. संजय राऊत म्हणाले, राज्यात सध्या लोकशाहीच्या प्रत्येक मंदिरात लोकशाहीचा खून केला जात आहे. शिंदे सरकारचा मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे. राज्यात घुसखोरांची टोळी घुसलीये व ही टोळीच सध्या सत्तेवर आहे. राज्यात खरोखर लोकशाही आहे की नाही, याचे उदाहरण काल शिंदे गटाने दिले.

संजय राऊत म्हणाले, शिंदे सरकारने ठोकशाही करू नये. ठोकशाहीत आमच्याशी स्पर्धा कुणीच करू शकत नाही. काल मुंबई पालिकेत शिवसैनिक गेल्यावर शिंदे गटाची कशी पळापळ झाली, हे सर्व राज्याने पाहिले आहे. शिंदे गटाचे नरेश म्हस्के हे पूर्वी मातोश्रीवर एकनाथ शिंदे यांच्या तक्रारी घेऊन यायचे. शिंदेंना आवरा असे ते उद्धव ठाकरेंना सांगत होते. तेच नरेश म्हस्के आज आम्हाला काय शिकवत आहे. तुमची सत्ता औटघटकेची आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचे काम करू नका, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम