
गलवान–तवांगमधील चिनी घुसखोरीची जबाबदारी तुम्ही घ्या; ठाकरेंचा घणाघात !
दै. बातमीदार । १४ डिसेंबर २०२२ । शिवसेना प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. ते म्हणाले कि, ‘मोदीनॉमिक्स’ प्रमाणेच मोदी सरकारच्या ‘यशस्वी’ परराष्ट्र धोरणाचे ढोल वाजवता ना, मग कश्मिरी पंडितांचे टार्गेट किलिंग आणि गलवान–तवांगमधील चिनी घुसखोरी याची जबाबदारीही घ्या. त्यासाठी आधीच्या सरकारांकडे बोट दाखवून पळ काढू नका. तुमची जबाबदारी तुम्हाला घ्यावीच लागेल.
उद्धव ठाकरेंचे मुखपत्र असलेल्या सामनात आज म्हटले आहे की, ‘चिनी सैन्य सीमेवरून हटायला तयार नाही,’ अशी कबुली गेल्याच महिन्यात खुद्द आपल्या लष्करप्रमुखांनीच दिली होती. त्यामुळे सीमेवर तणाव निर्माण होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला होता. फक्त महिनाभरात जर तो खरा ठरत असेल तर त्याची जबाबदारी आधीच्या सरकारांची की सध्याच्या सरकारची? मागे जे झाले ते झाले, पण आता चीनच्या सीमेवर जे घडले, जे घडत आहे त्याचे काय? उद्धव ठाकरेंनी पुढे म्हटले आहे की, चीनविरोधात मोदी सरकार ‘जशास तसे’ धोरण राबवीत आहे. चिनी सीमेवर हे सरकार तोडीस तोड संरक्षणसिद्धता करीत असून येथील सीमाभागात पायाभूत सुविधांचे जाळे तर 2014 नंतरच घट्ट विणले गेले, असे ‘दाखवायचे दात’ केंद्र सरकारची भक्त मंडळी येताजाता चमकवीत असते. मात्र अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर 9 डिसेंबरच्या रात्री जे घडले त्याने या दाखवायच्या दातांची ‘दातखीळ’ बसली आहे. चीनने पुन्हा त्याचे ‘खायचे दात’ दाखविल्याने केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे सगळेच दावे फोल ठरले आहेत.
उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे की, अरुणाचल प्रदेशमधील तवांग सीमेवर 9 डिसेंबरच्या रात्री चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. आपल्या जवानांनी गलवानप्रमाणे येथेही चिन्यांना त्यांची जागा दाखवली हे चांगलेच झाले, पण केंद्रातील सरकारचे काय? हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहिले तर जशास तसे उत्तर दिले जाईल, हिंदुस्थानची एक इंचही जमीन कोणाला गिळू देणार नाही, असे इशाऱ्यांचे ‘अग्निबाण’ सध्याचे सरकार नेहमीच बीजिंगच्या दिशेने सोडत असते. मात्र हे अग्निबाण फुसके आहेत आणि त्यांच्या इशाऱ्यांचे नगारेही फुटके आहेत हे 9 डिसेंबर रोजी पुन्हा सिद्ध झाले. दोन वर्षांपूर्वी गलवान खोऱ्यात जसा हल्ला चिन्यांनी हिंदुस्थानी सैन्यावर केला होता तसाच हल्ला तवांगमध्येही करण्याची चिनी लष्कराची योजना होती. सुदैवाने हिंदुस्थानी सैन्याने आक्रमक प्रत्युत्तर देत चिन्यांना हुसकावून लावले. या कामगिरीबद्दल संरक्षणमंत्र्यांपासून सरकारमधील सगळेच आता त्यांचे अभिनंदन करीत आहेत. ते व्हायलाच हवे, पण सरकार म्हणून तुमच्या ज्या उणिवा, चुका चिन्यांच्या कुरापतींमधून उघड होत आहेत त्याचे कोणते उत्तर तुमच्याकडे आहे?

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम