डॉ. आंबेडकरांना अभिवादन करत ठाकरेंची सत्ताधाऱ्यावर टीका

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ डिसेंबर २०२२ ।  देशाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिली. न्याय, स्वातंत्र्य, लोकशाही, नागरिकांचा हक्क यांचा पुरस्कार केला. आज त्या घटनेची पदोपदी पायमल्ली होत आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे. ठाकरेंचे मुखपत्र सामनात आज म्हटले आहे की, न्यायालये, वृत्तपत्रे, निवडणूक आयोग, संसद असे सर्व घटनात्मक स्तंभ कोलमडून पडले आहेत. अनेक प्रकरणांत कायदे स्वस्थ बसत आहेत. देशात काय घडत आहे हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. लोकशाहीतला तो पहिला धडा असतो; परंतु आजच्या सरकारने लोकशाहीच्या या प्राथमिक मूल्यावरच प्रहार केला आहे. देशाच्या एकसंधतेला तडे जातील असे हे धोरण आहे.

अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण प्रकर्षाने होतेय. लोकशाही, स्वातंत्र्य जेव्हा जेव्हा संकटात येईल त्या त्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे स्मरण करावेच लागेल. आम्ही आमच्या तमाम शिवसैनिकांतर्फे ते करीत आहोत, अशा शब्दांत सरकारवर टीका करत ठाकरेंनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आहे.
ठाकरेंनी म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67 वा महापरिनिर्वाण दिन. या महामानवास आज श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर त्यांच्या अनुयायांचा महासागर उसळेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमीच सांगत, ‘महाराष्ट्राची दोनच दैवते खरी. पहिले शिवाजी महाराज व दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.’ मात्र या दोन्ही दैवतांचा आज राजकारणापुरता वापर करण्याचे तंत्र सध्याच्या राज्यकर्त्यांनी अवलंबिले आहे.

ठाकरे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. त्यात लोकशाही, स्वातंत्र्य सगळेच आले. लोकशाहीमध्ये बहुमतवाल्यांच्या शासनाला विरोधकांची गर्भित व उघड संमती आवश्यक असते. म्हणूनच विरोधकांचा आवाज बंद पाडून तुम्ही त्यांना नष्ट करू शकत नाही. ख्यातनाम ब्रिटिश विचारवंत हेरॉल्ड लास्की म्हणतात, ‘आपल्या समर्थकांच्या स्तुतीपेक्षा टीकेतून सरकार अधिक शहाणे होत असते.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेने हे सर्व अधिकार व स्वातंत्र्य आपल्याला दिले. पण त्याच घटनेचे अवमूल्यन आज केले जात आहे व घटनेने दिलेल्या स्वातंत्र्यास पायदळी तुडवले जात आहे. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते. एका महान उदात्त हेतूने बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना तयार केली. पण ती अंमलबजावणीसाठी चुकीच्या लोकांच्या हातात गेली तर नुकसान होईल, असाही डॉ. आंबेडकरांनी तेव्हा इशारा दिला होता. आज त्यांची आठवण येते. ठाकरे म्हणाले की, ‘या देशात दगडाला शेंदूर लावणे सोपे आहे, पण नंतर तो खरवडून काढणे कठीण आहे’, असे आंबेडकर म्हणाले होते. आज अनेक शेंदूर फासलेल्या दगडांना देवत्व प्राप्त झाले. त्यांच्याकडे पाहून डॉ. आंबेडकरांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य राष्ट्राने आपल्या डोक्यावर धारण केले आहे. पण आज सत्य औषधापुरते नव्हे, तर औषधालाही मिळत नाही. नफेखोरांचेच राज्य चालले आहे व जनतेच्या प्रश्नांशी त्यांना काहीच देणे-घेणे नाही. म्हणून डॉ. आंबेडकरांची आठवण जनतेला रोजच येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम