
नेतेमंडळी निवडणुकीपूर्वी घेतात या मंदिरांचे दर्शन !
दै. बातमीदार । १७ नोव्हेबर २०२२ मंदिरात केलेली प्रार्थना आणि देवाला घातलेलं साकडं पूर्ण होते अशी धार्मिक श्रद्धा असून जेव्हा हिंदू धर्माशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला जेव्हा त्याच्या परिघाच्या बाहेरची इच्छा पूर्ण करायची असते तेव्हा तो नतमस्तक होण्यासाठी देवाच्या दारी जातो. भारतातील काही मंदिरांना किंवा देवांना नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. अशाच काही मंदिरात निवडणुकीच्या वेळी भक्तांचा महापूर येतो. या भक्तांमध्ये सर्वाधिक राजकीय क्षेत्रातील असतात. निवडणुकीत विजय मिळावा असं साकडं घालण्यासाठी भारतातल्या काही प्रसिद्ध मंदिरात अनेक दिग्गज नेते हजेरी लावतात.
श्री रामलला मंदिर, अयोध्या- उत्तर प्रदेशातील अयोध्येत असलेले भगवान श्री रामाचे मंदिर केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्ध आहे. रामललाच्या मंदिराला सध्या भव्य स्वरूप दिले जात आहे. असे मानले जाते की, जी व्यक्ती या मंदिरात जाऊन पूजा करतो तिला रामाचा पूर्ण आशीर्वाद मिळतो. त्यामुळेच निवडणुकीच्या वेळी लहान मोठे सर्वच नेते येथे दर्शनासाठी येतात.
कामाख्या मंदिर, आसाम- आसाममधील निलांचल टेकडीच्या शिखरावर असलेले कामाख्या मंदिर हे 51 शक्तीपीठांपैकी सर्वात प्रसिद्ध मंदिर मानले जाते. ज्याची इच्छा कुठेही पूर्ण होत नाही, ती या मंदिरात आल्याने नक्कीच पूर्ण होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मातेचा हा दरबार तंत्र-मंत्राद्वारे मनोकामना पूर्ण करण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळेच निवडणुकीच्या काळात अनेक मोठे आणि प्रसिद्ध नेते येथे येतात आणि येथे विशेष विधी आणि पूजा करतात. या दरबारातून कोणताही भक्त रिकाम्या हाताने जात नाही, असा विश्वास आहे.
महाकाल मंदिर, उज्जैन- मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील महाकाल मंदिर सर्व संकटे दूर करण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी ओळखले जाते. या जगप्रसिद्ध मंदिरात भगवान भोलेनाथाच्या दक्षिणाभिमुख शिवलिंगाची स्थापना आहे. असे मानले जाते की, जो भक्त महाकालची पवित्र मनाने पूजा करतो, त्याची सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात. यामुळेच पंतप्रधानांपासून ते सर्वसाधारण नेत्यांपर्यंत सर्वच जण महाकालच्या दारात नतमस्तक होण्यासाठी पोहोचतात. कामाख्या मंदिराप्रमाणेच महाकाल नगरीही तंत्र-मंत्राच्या अभ्यासासाठी अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते.
माता विंध्यवासिनी, मिर्झापूर- उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील माता विंध्यवासिनी मंदिराचे सिद्धपीठ सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते. जो कोणी मातेच्या दरबारात येऊन विधिवत पूजा करतो, त्याच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात, असा विश्वास आहे. त्यामुळेच निवडणुका जवळ येताच मोठ्या संख्येने नेते प्रार्थना करण्यासाठी या मंदिरात पोहोचू लागतात. त्रिकोण यंत्रावर वसलेले हे मंदिर असे एक शक्तिपीठ आहे, जिथे तंत्र-मंत्रांच्या साह्याने कार्यसिद्धी होते अशी धार्मिक मान्यता आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम