एमआयएमने केली राज्यातील या शहराची नामांतराची मागणी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ मार्च २०२३ । राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारने दिलेल्या प्रस्तावावर केद्र सरकारने मंजूरी दिल्यानंतर औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजी नगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्यात आलं आहे. पण औरंगाबादच्या नामांतराला एमआयएमने विरोध केला आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी औरंगाबादप्रमाणेच महाराष्ट्रातल्या इतर शहरांची नावंही बदलण्याची मागणी केली आहे. याचसोबत जलिल यांनी नामांतरानंतर या शहरांची नावं काय ठेवण्यात यावीत, हेदेखील सांगितलं आहे. ‘कोल्हापूरचं नाव बदलून छत्रपती शाहू करावं, पुणाचे पुणे झाले, पुणेचा काय अर्थ आहे? महात्मा फुले, ज्योतिबा फुले यांचं नाव द्या.
फुलेनगर नाव ठेवा, पुणेचे फुले करा. महान पुरुषांची नावं द्यायची असतील तर नागपूरला दीक्षा भूमी आहे, त्यामुळे नागपूरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या. मुंबई मोठं शहर आहे, बॉम्बेचं मुंबई केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मुंबईला द्या.

मालेगावचं नाव मौलाना आझाद करा,’ अशी मागणी एमआयएमने केली आहे. ‘औरंगाबादचे आधीचे नाव खडकी होते, नाव बदलायचं होतं तर खडकी का नाही दिलं? बाळासाहेब आले त्यांना राजकारण करायचं होतं आणि त्यांनी संभाजी नगरची घोषणा केली, त्यानंतर मोठे राजकारण झालं. भाजपला सवाल आहे, बिहारचं औरंगाबाद कसं चालतं?
महाराष्ट्राचं का चालत नाही? चालू अधिवेशनात, कोल्हापूर, पुणे आणि नागपूरचं नाव बदला आणि मोठ्या थोर नेत्यांची नाव द्या,’ असं इम्तियाज जलिल म्हणाले आहेत. ‘कोर्टात केस सुरू असेल तर निर्णय घेता येत नाही. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाबाबत मुंबई कोर्टात प्रकरण सुरू आहे.

मग केंद्र सरकारने कसा निर्णय घेतला? यातून केंद्र सरकारने आपण कोर्टाच्या सुप्रीम आहोत, हे दाखवून दिलं. मी ऐकलं नाही तरी माझं कोण काय करणार? औरंगाबादचं संभाजीनगर करण्यासाठी एक हजार ते बाराशे कोटींचा खर्च येणार आहे,’ अशी टीका जलिल यांनी केली.

‘संभाजी नगरच्याविरोधात बोलणाऱ्यांना सोशल मीडियावर टार्गेट केलं जात आहे. मी G20 च्या बैठकीवेळी गोंधळ करू शकलो असतो. भागवत कराड, पोलीस आयुक्त आणि देवेंद्र फडणवीस यांनीही विनंती केली, म्हणून मी संभाजी नगरच्या विरोधात आंदोलन केलं नाही, पण मी करू शकलो असतो. संभाजी नगरच्याविरोधात आमची न्यायालयात लढाई सुरू आहे, ती आम्ही रस्त्यावरही आणणार आहोत. मी दोन मीटिंग घेतल्या आहेत, थोड्या दिवसांमध्येच मोठं आंदोलन होईल. 27 मार्चआधी आम्ही रस्त्यावर येणार आहोत,’ असा इशारा इम्तियाज जलिल यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम