
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी !
दै. बातमीदार । २६ जुलै २०२३ । देशात पावसाचा धुमाकूळ सुरु असतांना आता याचा फटका राज्यातील अनेक जिल्ह्याला देखील बसला आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे, तर कुठं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई उपनगरासह ठाणे, पालघर या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, पालघर आणि मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महााष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर गडचिरोली, गोंदिया आणि नांदेडजिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अवर्ट जारी करण्यात आलाय. तर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्य्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आले आहेत. काही भागात वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. खेडमधल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळं प्रशासन अलर्ट झालंआहे. जगबुडी नदीपात्राजवळ पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. तर नगर परिषदेचे कर्मचारी पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवून आहेत. खेड तालुक्यातील पावसानं चांगलाच जोर धरलेला आहे. त्यामुळे खेडच्या जगबुडी नदीला पूर आला आहे. या नदीमध्ये वास्तव्यास असलेल्या महाकाय मगरी पाण्याबाहेर येऊन मोकळ्या जागेवरती आलेल्या पाहायला मिळतात.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम