सरकारचा मोठा निर्णय : राज्यात ‘इतके’ वैद्यकीय महाविद्यालय सुरु होणार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ जून २०२३ ।  राज्यामध्ये डॉक्टरांची कमतरता भरुन काढण्यासाठी तसेच गोरगरीब विदयार्थ्यांना माफक दरात वैदयकीय शिक्षण प्राप्त करून देण्यासाठी सन 2014 पासून शासकीय वैदयकीय महाविदयालये निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. देशाच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नागरीकांना उच्च दर्जाच्या वैदयकीय सेवा देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

त्याच अनुषंगाने AIIMS ची संख्या 7 वरुन 22 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 387 वरुन 654 इतकी वाढली आहे. तसेच MBBS च्या जागांची संख्या सुमारे 51 हजारवरुन सुमारे एक लाखांवर गेली आहे. त्यास अनुसरुन राज्याच्या प्रत्येक जिल्हयात शासकीय वैदयकीय महाविदयालये सुरु करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. त्याच दृष्टीने राज्य सरकारने 9 जिल्ह्यात नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

या प्रयत्नातून सन 2014 पासून ते आजतागायत असे मागील 9 वर्षामध्ये नवीन 10 शासकीय वैदयकीय महाविदयालये स्थापन झालेली आहेत. यामध्ये गोंदिया, चंद्रपूर, जळगांव, बारामती, सातारा, धाराशिव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, अलिबाग या जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हयातील शासकीय वैदयकीय महाविदयालयास केंद्र शासनाची मान्यता प्राप्त झाली असून यावर्षी सदर महाविदयालय सुरु होत आहे. परभणी व नाशिक जिल्हयात शासकीय वैदयकीय महाविदयालय सुरु करण्याबाबतच्या प्रस्तावास केंद्र शासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर ती देखील लवकरच सुरू होतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ज्या जिल्ह्यात शासकीय वैदयकीय महाविद्यालये नाहीत अशा ठाणे, पालघर, जालना, बुलढाणा, अमरावती, वाशिम, भंडारा, गडचिरोली, वर्धा या 9 जिल्हयात प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैदयकीय महाविदयालये सुरु करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये निर्मितीसाठी आशियाई विकास बॅक तसेच जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी अशा आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थाकडून वित्त विभागाच्या सहमतीने अल्प व्याजदरात अर्थ सहाय्य उपलब्ध करुन घेण्यास देखील मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आहे.

हिंगोली, अहमदनगर, मुंबई उपनगर या तीन जिल्हयांमध्ये जागा उपलब्ध करण्यामध्ये अडचणी येत आहेत मात्र तेथे जागा उपलब्ध करुन घेण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. सदर ठिकाणी जागा उपलब्ध झाल्यानंतर तेथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुंबई उपनगर या जिल्ह्यात मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय महाविदयालय आधीपासूनच अस्तित्वात आहे. नवीन शासकीय वैदयकीय महाविद्यालयांमुळे पुढील 4 वर्षामध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या सुमारे 1200 जागा निर्माण होऊन सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू, हुशार विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाची संधी अतिशय कमी शुल्कामध्ये उपलब्ध झालेली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम