उन्हाळ्याच्या सुट्टीत पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड लूट !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ मे २०२३ ।  मे महिना सुरू झाल्याने राज्यातील अनेक लोक उन्हाळी सुट्टीचे निमित्त कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश अशा सर्वच ठिकाणी पर्यटन करण्यासाठी जात असतात. एसटी गाड्यांच्या तिकीट दराच्या तुलनेत दुपटीहून अधिक तिकीट आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवाशांच्या लुटीला यंदाही उन्हाळी सुट्टीचे निमित्त मिळाले आहे. खासगी बसचे तिकीट दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. दिवसाढवळ्या ही लूट सुरू असताना, परिवहन आयुक्तालयात तक्रार आल्यावर कारवाई करू अशा भूमिकेत असल्याने प्रवाशांना अतिरिक्त रुपये मोजूनच प्रवास करावा लागत आहे.

उन्हाळी सुट्टीनिमित्त नियमित रेल्वे गाड्या पूर्ण आरक्षित झालेल्या आहेत. कोकणासह पुणे, पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या निवडक गाड्यांसाठी प्रतीक्षायादी सुरू झालेली आहे. विशेष गाड्यांच्या वेळांमुळे गावी रेल्वे स्थानक ते घर असा पल्ला गाठण्यासाठी वाहन नसल्याने प्रवाशांचा नियमित गाड्याकडे ओढा आहे. रेल्वे गाड्यामध्ये जागा नसल्याने प्रवासी शेवटच्या क्षणी खासगी बसकडे वळल्याने खासगी बस चालकांकडून प्रवाशांच्या अडचणीचा फायदा घेण्यात येत आहे. मुंबईहून सुटणाऱ्या अनेक खासगी गाड्यांचे दर अधिक आहेत. कोकणात जाणाऱ्या गाड्याचे तिकीट दर दीड ते दोन हजार रुपये आहे. तर पुणे-सातारा-सांगली पट्ट्यात देखील खासगीच्या तिकिटाला हजारो रुपयांचा दर आलेला आहे. एसटी भाड्याच्या दीडपटापेक्षा अधिक भाडे खासगी ट्रॅव्हल्सचे नसावे. यापेक्षा अधिक भाडे आकारल्यास खासगी चालक-मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. भाड्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाची आहे.

रेल्वेला गर्दी, एसटीच्या मर्यादित फेऱ्या आणि खासगीची बेफाम भाडेवाढ अशात गावी जाण्यासाठी अडचणी येतात. यामुळे तक्रार करण्याआधी गाडीतील आसने आरक्षित करण्यासाठी आमचा आग्रह आहे. तक्रार केल्यानंतर आरटीओचा ससेमिरा टाळण्यासाठी तक्रार करत नाही, असे दादरमधील प्रवासी जयेश वाघ यांनी सांगितले. दिवाळीचे १५ दिवस व मे महिना यामध्ये सर्वसामान्य नागरिक गावी जाणे किंवा पर्यटनासाठी बाहेर पडतात. मे महिन्याची सुट्टी लागलेली आहे. करोना निर्बंधमुक्तीचा हा पहिलाच उन्हाळा आहे. यामुळे प्रवासी मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. हाच प्रवासी वर्ग आपल्याला वर्षभर व्यवसाय देत असतो. सध्या राज्यातील सर्वच खासगी बस चालकांनी भरमसाट वाढ करत भाडे आकारणी सुरू केलेली आहे. यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओने ठरवून दिल्याप्रमाणे भाडे आकारावेत. राज्यातील सर्व खासगी बस चालकांनी नियमाप्रमाणे प्रवाशांची सेवा करावी, अशी विनंती आणि आवाहन माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम