
राज्यात महापुरुषांचा अवमान ; पुण्यानंतर आज वरळी बंद !
दै. बातमीदार । १५ डिसेंबर २०२२ । राज्यात महापुरुषांसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्य सुरूच आहेत. अगोदर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप नेते सुधांशु त्रिवेदी, प्रसाद लाड, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून विविध संघटनांनी त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. तर राज्यपालांना पदावरुन हटवण्याचीही मागणी करण्यात आली होती. याच वादग्रस्त वक्तव्यांविरोधात पुणे बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर आज वरळीतही बंद पुकारण्यात आला आहे.
महापुरुषांसंदर्भात सातत्याने होणाऱ्या अपमानास्पद वक्तव्यांविरोधात पुण्यापाठोपाठ मुंबईतील वरळीमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या महापुरूषांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांविरोधात आज मुंबईतील वरळी परिसरात बंद पाळला जाणार आहे.
वरळीतील आंबेडकरवादी आणि इतर संघटनांनी हा बंद पुकारला आहे. आज एकदिवसीय बंद पाळला जाणार असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत बंद पुकारला आहे. वरळी परिसरात आंबेडकरवादी आणि बहूजन महापुरुषांना मानणाऱ्या संघटनांसह इतर छोटे पक्ष आणि वरळीकर जनता यांच्यावतीने वरळी बंदची हाक देण्यात आली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम