
मंत्री आठवलेंचा मोठा गौप्यस्फोट ; अजितदादा या कारणाने आले नाहीत !
दै. बातमीदार । ७ मे २०२३ । राज्यातील सोलापूर दौऱ्यावर देशाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले आलेले आहेत. त्यांनी यावेळी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
त्यांनी अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांच्या मनात तशी कल्पना असण्याची शक्यता होती. त्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा एकदा पहाटेचा शपथविधी झाला आहे. अजित पवारांच्या मनात अनेक दिवसापासून ठाकरे गट आणि काँग्रेससोबत राहण्यापेक्षा भाजपसोबत जाण्याची भूमिका असावी. मात्र पवार साहेबांचा पाठिंबा नसल्यामुळे अजित पवारांनी आपली भूमिका बदलली असावी, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
पवारांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दरम्यान यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी शरद पवारांच्या राजीनाम्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी जो राजीनामा दिला होता तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणल्यानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला. राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांच्या व्यतिरिक्त दुसरा मोठा नेता राष्ट्रवादीत नाही. त्यामुळे शरद पवार यांनीच अध्यक्षपदी कायम राहावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यामुळे पवारांनी राजीनामा मागे घेतला असावा असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ‘शिंदेच मुख्यमंत्री’ पुढे बोलताना रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचं म्हटलं आहे. शिंदे सरकार कायम राहणार आहे. आमच्याकडे 164 आमदार आहेत, त्यामुळे आम्हाला भीती नाही. कोर्टाने धनुष्यबाणाबाबत जो निर्णय दिला तो मेरीटच्या आधारावर दिला आहे. कोर्ट कधी भावनात्मक विचार करत नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदारांची मेजॉरिटी आहे, त्यामुळे कोर्टाचा निकालही त्यांच्याच बाजुने लागेल असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम