जळगाव जिल्ह्यातील ‘या’ गावात राजकीय नेत्यांना बंदी ; होर्डिंग आले चर्चेत !

दुष्काळी तालुक्याच्या मागणीसाठी पुढाऱ्यांना गावबंदी करणारे राज्यातील पहिले गाव

बातमी शेअर करा...

बातमीदार | ४ नोव्हेबर २०२३

शासनाने राज्यातील दुष्काळी व मध्यम दुष्काळी परिस्थितीत असलेल्या तालुक्याची यादी जाहीर केली. त्यात अमळनेर तालुक्याचा समावेश नाही.अमळनेर तालुक्याचा समावेश दुष्काळी यादीत करून जाहीर केले जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा रोष वाढतच जाणार आहे , तालुका दुष्काळी जाहीर होत नाही, तोपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय जानवे ता. अमळनेर येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

या आशयाचे निवेदन अमळनेरचे तहसीलदार रुषेशकुमार सुराणा यांना देण्यात आले असून ,त्या आशयाचे बॅनर बनवून गावातील मुख्य चौकात लावण्यात आले आहे , अमळनेर तालुक्यात सुरुवातीला सलग ४२ दिवस पाऊस पडलेला नाही. पाण्याअभावी पिके करपली. शेतकऱ्यांना उत्पन्न आलेले नाही. कापूस, मका, ज्वारी, उडीद मुग पिकांचे नुकसान झाले आहे. पीक विमा मिळाला नाही. तरीही शासनाने जाहीर केलेल्या यादीत अमळनेर तालुक्याचा समावेश नाही. जोपर्यंत अमळनेर तालुक्याचे नाव दुष्काळी यादीत येत नाही तोपर्यंत राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात येण्यास बंदी करण्यात येत आहे. कोणी प्रवेश केला तर अपमान करण्यात येईल, असा इशारा देणारे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदा व पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे. याबाबत गावात बॅनर लावून फलक लावण्यात आला आहे.

दिनांक ३१ रोजी राज्य सरकारच्या महसूल व वनविभागाने गंभीर व मध्यम दुष्काळी तालुके जाहीर केले व निकष आणि उपाययोजना बाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे मात्र त्यातून गंभीर व मध्यम दुष्काळी तालुक्यात अमळनेर तालुक्याचा कुठेही समावेश करण्यात आला नाही , त्यामुळे शेतकऱ्यांच्या जनभावना तीव्र झाल्या असून शासनाविरुद्ध जनक्षोभ वाढत आहे , मुळात अमळनेर तालुक्यात सुरुवातीला पावसाने उशिरा हजेरी लावली त्यात सर्व आठही मंडळात कमीतकमी ४२ दिवसांचा पावसाचा खंड पडला तसे जिल्हाधिकारी यांनी जाहीरही केले , त्यानुसार पीक पाहणी व कापणी प्रयोगात जवळपास ८० टक्के नुकसानीचा अंदाज वर्तविला गेला ,तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान पेक्षा २५ टक्के पाउस कमी पडला म्हणून दुष्काळी झळा आतापासूनच जाणवू लागल्या आहेत ,उत्पादन खर्च ही शेतकरी वर्गाला निघणार नसून त्यामुळे कर्जाचा डोंगर चढून शेतकरी मेटाकुटीला आला आहे , शेतीच्या बांधावर उगवलेल्या गवताच्या वाती होऊन सुकून गेल्या ,पिके कोमेजून लाल पडली सोयाबीन ,मूग ,कापूस ,मका तुवर आदीपिके हातची गेली म्हणून आता चाराच उपलब्ध नसल्याने तालुक्यातील पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई भर हिवाळ्यात जाणवू लागली आहे , तापी व पांझरासह बोरी पट्यात आजच उस कापूस जनावरे जगवण्यासाठी तळमळ सुरू झाली आहे त्यात तालुक्यातील उत्पादनात घट झाली असूनही शासन निकषात अमळनेरचा समावेश होत नाही ही शोकांतिका आहे , आता शासन विरोधी जनक्षोभ वाढत असून शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होत असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही तर शेतकऱ्यांचा उद्रेक होईल , त्याचाच एक भाग म्हणून अमळनेर तालुक्यातील जानवे गावी ग्रामस्थांनी स्वयंपूर्तीने निर्णय घेतला असून सर्व राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधी पुढाऱ्यांना गाव बंदी घालण्यात आली असून दुष्काळी यादीत अमळनेर तालुक्याचा जोपर्यंत समावेश होत नाही तो पर्यंत ही गाव बंदी लागू राहणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे . निवेदनावर कल्पेश पाटील ,शिवाजी पाटील ,अशोक बोरसे ,समाधान पाटील ,शरद पाटील ,सरलाबाई पाटील ,विजय पाटील ,मधुकर पाटील ,दगडू पाटील ,ईश्वर पाटील ,भपेश पाटील ,प्रकाश पाटील आदींसह १०९ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम