..हा विचार करून मनात धस्स होतं : राज ठाकरेंची प्रतिक्रिया !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ जुलै २०२३ ।  महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा भूकंप झाला. राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजभवनावर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्याला आता देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे असे दोन मुख्यमंत्री आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या बंडामुळे शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

राज ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच ! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.

बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार का? अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केली

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम