खा.सुप्रिया सुळे यांनी केली उड्डाणपुलाला नेत्याच्या नावाची मागणी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ मे २०२३ ।  राज्यातील अनेक उड्डाण पुलाला महापुरुषांची व नेत्यांची नावे देण्यासाठी नेहमीच कार्यकर्ते आग्रही असतात. पण आता राज्यातील राष्ट्रवादीच्या खा.सुप्रिया सुळे यांनी थेट पुण्यातील प्रसिद्ध चांदणी चौक इथे होत असलेल्या उड्डाण पुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट याचे नाव द्यावे अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

“पुणे शहरातील चांदणी चौक इथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरु आहे. या परिसरातील वाहतूक कोंडी व अपघात यावर उपाययोजना करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्र शासनाकडे यापुर्वी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. यावर चांदणी चौकात पुलाचे काम नव्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार काम देखील सुरु आहे. आता हे काम अंतीम टप्प्यात आहे.”

“हा पूल मुळशी तालुका, पुणे शहर आणि परिसराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यासोबतच तो पुणे-सातारा-बंगळुरू महामार्गावरील एक महत्वाचे ठिकाण असणार आहे. मुळशी तालुक्यास ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. याच तालुक्यात थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांनी 1921 साली शेतकरी व भूमीपुत्रांच्या संघर्षाची पहिली मोठी नोंद असणारा ‘मुळशी सत्याग्रह’ केला.या सत्याग्रहाला नुकतीच शंभर वर्षे पुर्ण झाली आहेत.”

“देशाच्या स्वातंत्र्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनांपैकी हे एक महत्त्वाचे आंदोलन अशी त्याची नोंद आहे. यानिमित्ताने या सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांच्या स्मरणार्थ चांदणी चौक येथील उड्डाण पुलास त्यांचे नाव देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करता येणे शक्य आहे. यासाठी माझी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री मा नितीनजी गडकरी यांना विनंती आहे की कृपया आपण यासंदर्भात सकारात्मक विचार करुन यासंदर्भात निर्णय घ्यावा.”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम